शिक्षणबदलात समाजाची मते आधीच घ्या

मटाच्या  28 JUN 2019 मधे लेख











शिक्षणबदलात समाजाची मते आधीच घ्या
--- लीना मेहेंदळे
२४ जून २०१९

बालभारती दुसरीचे नवे गणित या विषयावर इतकी प्रतिक्रिया उमटली की विधानसभेत त्यावर तज्ज्ञ समितीकडून चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले.

मुळात शिक्षण पुस्तकात बदल केला की पेनच्या एका फटकाऱ्यामुळे लक्षावधि मुलांवर, तसेच शिक्षक, व पालकांवर त्याचा परिणाम होणार असतो. म्हणून तो करताना मोठ्या प्रमाणावर समाजमंथनाची गरज असते. तसे न करताच बालभारतीने हा बदल केल्यामुळे आता हा बदल कसा बदलच नाहीये हे सांगावे लागत आहे. आधी समाजमंथन केल्याने हा प्रसंग टळला असता.

बदल का केला याची मुख्यत्वे तीन कारणे सांगितली -- ती का असमर्थनीय वाटतात ते पाहूया.

पहिला विचार होता जोडाक्षरांचा -- म्हणे मुलांना जोडाक्षरविरहित शिकवण्यासाठी हा बदल आहे. तर मग इतर विषयांनाही तसे केले का? की गणिताचा एकांगीच विचार केला? एकीकडे अमेरिकेसारखे देश संशोधन करून आदेश काढतात की मुलांना संस्कृत शिकवा -- त्याने उच्चरण, स्मरणशक्ति, .. बरेच काही वाढते. आणि आपण जोडाक्षरांचा बाऊ करायचा? याबाबतीत अंबुजा साळगांवकर व इतरांनी एक छान प्रश्न विचारलाय -- गणितातील जोडाक्षरे काढून टाकून आपण भाषा शिकण्याच्या वयात अवघड गोष्टींच्या सरावाच्या काही सहज संधी संपवतो आहोत असे नाही का?

अंबुजानी पुढे असेही म्हटले आहे की मुलांना पाढ्याच्या तासाला पन्नास, सत्तर, नव्वद हे अंक आणि त्यापुढचे अंक म्हणताना जोडाक्षरामुळे एक उर्मी चढते. संख्यावाचनातील जोडाक्षरे ही पाढे म्हणताना मुलांना उत्साह पुरवणारी स्थानं आहेत आणि त्यामुळे ती रूढ झालेली आहेत. म्हणजे गणित विषयाचा विचार करताना भाषा किंवा नादशास्त्राला विसरून चालणार नाही हे तिच मत मला पुरेपुर पटतं. तोच मुद्दा तिने पुढेही नेला आहे. एकवीस, बावीस, तेवीस..... म्हणत असतांना यमक जुळत असल्याने एक लय निर्माण होते. गोडी वाढवायला तीही गरजेची असते.

पुस्तकात दिलेले दुसरे कारण असे आहे की नव्या पद्धतीत बोलणे आणि लिहिणे यांचा क्रम सारखाच राहतो. पण त्याच कारणाने जसजशी वर्षे सरतील तसतसे तिसरी, चौथी, पाचवी इ. . मधेही हे बदल दरवर्षी केले जातील का याबद्दल बाळगलेले मौन दाखवून देते की बालभारतीने पुढचा विचारच केला नाही. आणि हे समर्थनीय नाहीच. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण मुलांना त्या इयत्तांमधे मोठी गणित शिकायची व करायची असतात. त्यासाठी पूर्वीचेच शब्द योग्य आहेत, नव्या पद्धतीचे अगदी अयोग्य कारण एका शब्दाऐवजी दोन म्हणावे लागले तर स्पीड मारली जाते.

ज्या पालकांना आपल्या मुलांनी मोठ्या वर्गात गेल्यानंतर भराभर गणिते सोडवावी अशी इच्छा असेल त्यांनी लक्षात ठेवावे की पंचवीस साते पंचात्तरासे ऐवजी वीस पाच साते एकशे सत्तर पाच म्हटल्याने स्पीडचा अॅडव्हांटेज जातो.
नव्या पद्धतीची भलामण करताना इंग्रजीतही तसेच आहे हा तर्क नसून अनुकरण आहे. इतर दक्षिणी भाषांमधेही तसेच आहे हे निव्वळ सांगण्यापुरते वाटते. कारण तसे असते तर ही नवी पद्धत दहा एक, दहा दोन पासून सुरू केली असती पण ती वीस एक, वीस दोन पासून सुरू झालेली आहे. म्हणजे अंतस्थ हेतु आपण इंग्रजीसारखे व्हावे हाच आहे. आणि दक्षिणी भाषांमधे आहे हा विचार करायचा तर इतर उत्तरी भाषांमधे तसे नाही हा विचार का नाही करायचा?

माझा आक्षेप आहे तो इंग्रजीत संख्यावाचनामधे खूप वेळ वाया जातो या कारणासाठी देखील आहे. माझ्याकडे यूपीएससी, बँकिंग इत्यादि स्पर्धापरीक्षांच्या मार्गदर्शनासाठी मुले येतात. त्यांना गणिती प्रश्नांच्या तयारीसाठी आधी मराठी संख्यानामे व पाढे पाठ करा असेच माझे सांगणे असते, कारण गणितात स्पीड नसेल तर दिलेल्या वेळेत पेपर सोडवता येत नाहीत.

माझ्या स्वतःच्या मुला-नातवंडांबाबत तसेच इतरही लहान मुलांबाबत माझा अनुभव असा की आपण समजाऊन सांगितले तर त्यांना समजते. तेवीस म्हणजे वीस नी तीन हे समजाऊन द्यावेच लागते. पण वीस नी तीन ऐवजी वीस तीन म्हटल्याने स्पष्टता वाढत नसून गोंधळच वाढणार.

एक ते शंभर या संख्या शिकताना मुले कुठे अडखळतात? तर एकवीस ते अठ्ठावीस किंवा एकतीस ते अडतीसमधे नाही अडखळत. म्हणजे वीस नंतर एकवीस म्हणायचे किंवा चाळीस नंतर एक्केचाळीस म्हणायचे हे त्यांना समजते. मात्र अठ्ठावीस नंतर एकोणतीस म्हणायचे हे मुलांना पटकन आकलन होत नाही, त्यासाठी वीसच्या पुढचे दशक तीसचे आहे हे समजावे लागते, आणि एकोणवीस म्हणजे एक उणे वीस असा अर्थही सांगितला तर तो ही समजतो.. आता अठ्ठावीस ऐवजी वीस-आठ व पुढे वीस-नऊ शिकवल्याने काय बदल होणार? कारण वीसनऊच्या पुढला आकडा तीस आहे आणि तीसनऊच्या पुढे चाळीस आहे हे ही समजण्याला किंवा लक्षांत ठेवाायला मुलांना तितकेच कठिण. म्हणजे प्रश्नाचे मूळ आहे ते मुलांना वीस तीस चाळीस पन्नास हा क्रम लक्षात येत नाही हा आहे. मग मुलं जुन्या पद्धतीत अठ्ठावीस नंतर एकोणतीसला तरी अडखळतील किंवा नव्या पद्धतीत वीसनऊ नंतर तीसला तरी अडखळतील. या साठी मी मात्र माझ्या मुलांना १ ते १० नंतर आधी दहा वीस तीस हा क्रम शिकवला, त्यामुळे अठरा-एकोणीस-वीस हे सोपे गेले. नंतर कधीतरी संख्या लेखनासाठी एकावर एक अकरा ते एकावर नऊ एकोणीस - दोनावर शून्य वीस असे शिकवले.

इंगरजीचे अनुकरण करताना आपण एक विसरतो -- संस्कृतसकट सर्व भारतीय भाषांना संख्यानामांची मोठी परंपरा आहे. त्याने आपले म्हणणे कमी शब्दात मांडले जाऊन ज्ञानग्रहणाची स्पीड वाढते. अगदी परार्द्ध वगैरे पर्यंत आकडे आपण अभिमानाने मोजतो. त्यातले एक सोप्पी संकल्पना आधी समजाऊन घेऊ या.

भारतीय संख्याशास्त्रात शंभरपट या संकल्पनेला खूप महत्व आहे.
१०० x १०० = दहाहजार -- त्यापुढे नव्व्याण्णव हजारपर्यंत जाता येते. की पुढे
१०० x १०० x १०० = दशलक्ष
१०० x १०० x १०० x १०० - दशकोटि.....
म्हणजेच शतंचे स्थान ओलांडून मोठ्या संख्यांना गेलो की त्या पलीकडे दोनदोनाच्या जोडीने व एकाच शब्दाच्या मदतीने ती संख्या वाचायची असते.
अशी पद्धत निर्माण करता येण्याला भाषाप्रभुता म्हणतात. ते करताना संस्कृतमधील नियम – संख्यानां वामतो गति हा कित्येत भाषा पाळतात व सर्व दोन आकडी संख्यांना एका शब्दाने व्यक्त करतात. अगदी दक्षिणी भाषांनीही दाक्षिणात्य क्रम ठेवला असला तरी दोन्ही शब्दांची संधी करून एकच शब्द राहील ही काळजी घेतली आहे व ते ही एका फटक्यात न होता वर्षानुवर्षांच्या वापरातून झालेले आहे. वीस एक, वीस दोन म्हणतांना तो अॅडव्हांटेज जातो.

भाषेत छोट्या तसेच विविध शब्दांची मातब्बरी काय? जॉर्ज ऑरवेलच्या १९८४ या गाजलेल्या कादंबरीत हा मुद्दा फार छान मांडला आहे -- कोणत्याही भाषेत शब्द जेवढे अधिक तेवढी विचारशक्ति व विचार व्यक्त होऊन लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता अधिक. म्हणून बिगब्रदर (खलनायक व सर्वोच्च शासक) सर्व डिक्शनऱ्या रद्द करून नवी कमी शब्दांची भाषा आणतो. त्यात बेटर नाही म्हणायचे तर गुड-प्लस आणि बेस्ट ऐवजी गुड-प्लस-प्लस म्हणायचे. कादंबरीच्या शेवटी नायक प्रेमादराने या शासकाचे आभार मानत त्याचा निस्सीम भक्त होतो अशी सुन्न करत चीड आणणारी कादंबरी आहे.

गणितातील संख्यानामांची परंपरा घालवणे हा फक्त गणिताच विषय नाही हे बालभारतीने ध्यानात घ्यायला हवे. इथे भाषाशास्त्रज्ञांचाही संबंध येतो. तीस आठ ही आपल्या इंग्रजीशरण मानसिकतेतून आलेली बाब आहे. बिच्चाऱ्या अक्षम मराठीला इंग्रजी अनुसारी करून तिला सक्षम समर्थ बनवण्याचा प्रयत्न आहे का?

आता खुलासा देतांना हा बदल नाही वगैरे खूप सांगितले गेले. मग मी संख्या वाचू लिहूया या मथळ्याचे पान नीट पाहिले आणि विचार आला -- मी हे कसे वाचीन? पहिल्या स्तंभात २१ संख्या लिहिली आहे -- पुढे दुसऱ्या स्तंभात वीस एक - एकवीस असे छापलेले आहे. याचा मौखिक उच्चार कसा करणार? २१ ला मी दोनावर एक अस वाचीन. पुढे? वीस एक एकवीस असं म्हणणं किती तरी गोंधळाच. म्हणूनच तिथे वीस नी एक असं लिहिल असत तर सगळा गोंधळ संपला असता.

बालभारती दुसरीच्या गणिताच्या पुस्तकाला मागील आवृत्तिच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बदललेले आहे की फक्त संख्यावाचनाची पद्धत बदलली आहे? जर निव्वळ दुसरा बदल केला असेल तर त्यासाठी किती खर्च आला आणि त्याची गरज होती का हा प्रश्न प्रस्तुत ठरतो. ही नवी कोरी पुस्तके छापून घेण्याला जेवढा खर्च आला त्यात किती शिक्षक प्रबोधन होऊ शकले असते हे गणित बालभारतीला करता येईल का हा प्रश्नही योग्य ठरतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट