उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९


उद्धव गीता भाग १
भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधात सात ते एकोणतीसवा अध्याय यात श्रीकृष्णाने उद्धवाला जो दीर्घ उपदेश दिला त्याचे वर्णन आहे. हाच उद्धव गीता या नांवाने ओळखला जातो. त्यापैकी ते अध्याय अवधूत आख्यान आहे, जे स्वतःच्या वेगळेपणामुळे एरवीही छोट्या आख्यानाच्या रूपाने प्रसिद्ध आहे.
ऋषींकडून यदुवंशाला नष्ट होण्याचा शाप मिळाला. पण त्याचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न बलराम अथवा श्रीकृष्ण यांनी केला नाही. त्या ऐवजी बलरामाने लगेच वनात जाऊन आपले अवतारकार्य संपवले. श्रीकृष्णही तसेच कांही करणार या विरह-जाणीवेने उद्धव व्याकुळ झाला. तू तरी आम्हास सोडून जाऊ नकोस असे म्हणू लागला. पण श्रीकृष्णाने त्याला बजावून सांगितले की आता तू स्वजन बांधवांचा मोह सोड, द्वारका सोड, आणि संपूर्ण चित्त माझ्या ठायी ठेऊन समदृष्टिने पृथ्वीवर विचरण कर. समदृष्टी – म्हणजे प्रत्येक प्राण्यांत, किंबहुना चराचराच्या प्रत्येक कणांत मीच दिसेन अशी तुझी दृष्टि होऊ दे. मग उद्धवाला पुढील काळासाठी जणू शिदोरीच, असा उपदेश श्रीकृष्णाने केला.
महाभारत युद्धानंतर एकदा अर्जनाने पुन्हा मला गीतेच तत्वज्ञान सांग अशी विनंति केली असता श्रीकृष्ण म्हणाला होता कि अर्ज, पुन्हा ते तत्वज्ञान सांगणे कठिण आहे. पण कारणपरत्वे उद्धवाला उपदेश देताना त्यातील बराच भाग श्रीकृष्णाने पुन्हा मांडला आहे असे समजून येते. त्याचाच आढावा येथे प्रस्तुत आहे.
या जगात जे जे इंद्रियांकडून जाणले जाते ते सर्व नाशवन आहे. ्याप्रमाणे स्वप्नात दिसणारे सर्व मनोविलास असते आणि जागृत आल्याशिवाय हे समजत नाही, त्याचप्रमाणे जागृतत दिसणारे देखील मनोविलासच असतात आणि समदृष्टि आल्याशिवाय याची जाणीव होत नाही. संसारातील बाह्य वस्तूंमधे आपण भेदाभेद करतो. असे ते असंख्य भेद, त्यांचे वेगळेपण, त्या वेगळेपणाची चर्चा, यातच मनुष्य गुंग होऊन जातो. त्या मधे गुण आणि दोष असा भेदही केला जातो. मग कर्म, अकर्म (म्हणजे विहित कर्मांचा लोप) आणि विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म असेही भेद उत्पन्न होऊन त्यांनाही राग- द्वेषाचे आडंबर चिकटवले जाते.
म्हणून हे उद्धवा, तू अगोदर इंद्रियांना वश कर. भगवद्गीतेत, किंवा तिला आपण अर्जनगीतअसे म्हटले तर अर्जगीतेत देखील हेच सांगितले आहे -- तस्मात् त्वं इंद्रिण्यादौ नियम्य भरतर्षभ
हे उद्धवा, तू इंद्रियापाठोपाठ चित्तवृत्तींना पण थोपव आणि विचारांद्वारे, बुद्धिच्याद्वारे हे समजून घे की तुझा आत्मा हाच या बाह्य जगाला प्रकट करीत आहे. एकीकडे तो बाहय जगासोबत तादात्म्य करीत आहे, तर दुसरीकडे तोच माझ्या परमात्मस्वरूपाला जोडलेला आहे. असे समजल्याने तू ज्ञानविज्ञानाने संपन्न होशील.
तस्मात् युक्तेंद्रियग्रामो युक्तचित्त इदं जगत् ।
आत्मनीक्षस्व विततमात्मान मय्यधीश्वरे।।
गीताप्रेसच्या भाष्यकारांनी ज्ञान आणि विज्ञान यांची तर्कसंगत व्याख्या केली आहे. ज्ञान म्हणजे वेदांत वर्णन केलेल तथ्य माहीत करून घेणे आणि विज्ञान म्हणजे आपण स्वतः त्यापैकी निदान कांहीची अनुभूती करून घेणे असा अर्थ लावला आहे. एक तरी ओवी अनुभवावी असे उगाच नाही ज्ञानेश्वर सांगत. भागवतकारांनी देखील अश व्यक्तींचे आत्मानुभवतुष्टात्मा असे वर्णन केले आहे. तर स्वानुभवातून, स्वानुभतितून जेंव्हा आपलाच आत्मा या बाह्य जगातही व्याप्त आहे ही आनंददायी जाणीव होते तेंव्हा ती व्यक्ति विज्ञानयुक्त होते. अशा व्यक्तीला या जगातील विघ्ने त्रास देऊ शकत नाहीत.
जसे लहान अर्भकाला गुण- दोष यांचे आकलन नसल्यामुळे ते बालक एखादे काम करतांना त्याच्या गुण- दोषांची चिकित्सा करीत नाही, तद्वतच अनुभूति घेतलेला विज्ञानी ही चिकित्सा करीत नाही. पण याचे कारण बालकाप्रमाणे अज्ञान नसून अनुभूतिजन्य विज्ञान हे असते. म्हणूनच असा तो ज्ञानी निषिद्ध गोष्टींपासून आपोआप परावृत्त होतो.
दोषबुद्धोभयातीतो निषेधान्न निवर्तते।
गुणबुद्धया च विहितं न करोति यथार्कः।।
असा आत्मदर्शी हा सर्वथा शांतिचित्त आणि सर्व प्राणिमात्रांना सुहृद् मानणारा होतो. र्जनगीतेतही म्हटले आहे - सुहृदं सर्वभूतानाम् ज्ञात्वा माम् शांतिमृच्छति ज्ञानी पुरुष सर्व प्राणिमात्रांना सुहृद असे जाणून स्वतः अपार शांति पावतो. तसेच व त्यामुळे तो पुन्हा जन्ममृत्च्या चक्रात अडकत नाही.
यावर उद्धवाने विचारले श्रीकृष्णाला संन्यास आणि त्याग यांबद्दल विचारले. उद्धव म्हणतो - हे कृष्णा, तू कालातीत सत्य, स्वयंप्रकाश, आत्मस्वरूप, नारायण, नरसखा, सर्वज्ञ, सर्वश्वर आणि मायेच्या मोहपाशातून सोडवणारा आहेस. म्हणून तूच मला हे तत्व सांग. इंद्रियजन्य विषयभोगाचा त्याग करणे अत्यंत कठीण आहे. मी व माझे या विचाराने मनुष्य पूर्णपणे भारावलेला असतो. असा माणूस संन्यासाप्रत कसा पोचतो ते तत्व मला पूर्ण निरूपण करून सांग. अर्जनही शेवटच्या अध्यायात संन्यास आणि त्यागाचीच महती विचारतो-
संन्यास् महाबाहो तत्वमिच्छमि वेदितुम
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिसूदन।।
श्रीकृष्ण सांगतो की हे उद्धवा, आत्मा हाच याबाबतीत आपला गुरू असतो - आत्मनो गुरूरात्मैव। अर्जनगीता देखील सांगते – आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः। मी जरी ही संपूर्ण सृष्टि निर्माण केली असली तरी त्यातील मनुष्ययोनी ही विशिष्ट आहे. कारण मनुष्य हाच तीक्ष्णबुद्धीच्या योगाने व एकाग्रचित्त होऊन बुद्धिपलीकडील जो परमात्मा, त्याचा अनुभव घेऊ शकतो. असा अनुभव घेतलेला जो अवधूत दत्तात्रेय, तो यदुराजाला कसा दिसला -- तर निपुणबुद्धि, परम विद्वान्, सर्व यशदायी कर्म करण्यास समर्थ, तरीही त्या कर्मेच्छेपासून अलिप्त, काम आणि लोभ या दोघांच्या बंधनातून मुक्त, आत्मानंद घेत स्वरूपावस्थित असे अवधूताचे रूप यदुराजाला दिसले. या स्वरूपाप्रत येण्यासाठी लागणारे ज्ञान कसे मिळाले हे विचारल्यावर अवधूतांनी आपण कोणते चोवीस गुरू केले व त्यांच्याकडून कोणते गुण ग्रहण करीत स्वतःच्या आत्म्यला एकाग्रचित्ताने जाणून घेतले तो उपदेश केला. या आख्यानामधे ब्रह्मावलोधिषणः पुरूषः अशी मनुष्याची व्याख्या केली आहे, म्हणजे जो बुद्धि- ज्ञानाच्या योगाने परब्रहमाचे अवलोकन करू शकतो, तो मनुष्य.
दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतो कि मनुष्याने माझी भक्ती करीत स्वधर्मपालन करतांना सदाचार व निष्काभाव सोडू नयेत. जग हे मिथ्या कां आहे, तर ज्या प्रमाणे स्वप्नावस्थेत निव्वळ मनोरथांचे डोंगर उभारले जाऊन हाती कांहीच लागत नाही, तद्वतच जागृत अवस्थेतही इंद्रिय-प्रयत्नातून साध्य केलेल हे जग तितकेच क्षणभंगूर असल्याने हाती लागू शकत नाही. म्हणून आत्मज्ञान हवे असल्यास सकाम कर्मांचा त्याग करावा. यम-नियमांपैकी यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह) हे त्याज्य नाहीत पण नियम मात्र माझ्या तीव्र उपासनेच्या आड येत असल्यास त्यांचाही त्याग करावा (उदा. शौच,स्वाध्याय) माझ्या प्राप्तिसाठी योग्य गुरू शोधून त्यावर श्रद्धा ठेऊन रहावे. आळस न करता कुशलतेने कामे करावीत. संसार, स्वजन, धन-धान्य आदिंबाबत मोहमय ममत्वाचा त्याग करावा.
ज्याप्रमाणे स्थूल लाकूड आगीच्या योगाने प्रज्वलित होते पण आग मात्र लाकडापासून अलिप्त रहाते त्याप्रमाणे देहाभिमान तसेच जन्ममृत्युरूप संसारचक्रातून ज्ञानाग्निच्या सहाय्याने अलिप्त हता येते.( अर्जनगीता सांगते- ज्ञानाग्निः सर्व कर्मणि भस्मसात् कुरूते।) बुद्धिमान शिष्य व योग्य गुरू यांच्या संयोगाने हा ज्ञानाग्नि प्रकट होतो.
अर्जनाने स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारली त्याप्रमाणे उद्धवही विचारतो की बंधयुक्त जीव आणि बंधमुक्त जीव यांची लक्षणे कशी ओळखावीत ? बंधमुक्त पुरूष कसा वागतो, कसा विहरतो, कसा खातो, कसा उठतो-बसतो, कसा झोपतो, इत्यादि. कारण आत्मा नित्यबद् भासतो व नित्यमुक्तही भासतो त्यामुळे मी भ्रमात पडलो आहे.
यावर श्रीकृष्णाचे उत्तर असे की सुखदुःखांचा भोक्ता असणारा जीव हा बंधनात असतो. मनुष्य जरी अतिशय यशस्वी, धनवान, व सुखोपभोग घेणारा असला तरी ते सुखही क्षणभंगुर आहे. पुण्यफल भोगून झाले की त्या पुण्याचा क्षय होत जातो आणि शेवटी असे क्षीणपुण्य झालेले प्राणी पृथ्वीवर पुनहा जन्म घेतात. (अर्जनगीता- क्षीणे पुण्ये मर्त्य लोके विशन्ति)
जीव जो पर्यंत सत्व, रज, तम, या गुणांना व इंद्रियांना आपले स्वरूप समजतो तोपर्यंत त्याला सुख- दुख, राग- द्वेष व अभिमान यांची जाणीव असते व तो बंधनात असतो ( अर्जनगीता- बंध मोक्षच या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकि) या गुणकर्मफलांचे वैराग्य आले की मोक्षाची वाट सुरू होते.
श्रीकृष्ण सांगतो की आत्म्याला बद्ध किंवा मुक्त या उपाधि सत्व, रज, तम या त्रिगुणांमुळे मिळतात. स्वप्न हे जसे बुद्धिचे विवर्त, तसेच शरीराचा जन्म- मृत्यु, सुख- दुःख हे ही मायेने उत्पन्न केलेले विवर्त (मिथ्या)आहे. देहधारींना मुक्तीचा अनुभव देणारी आत्मविद्या आणि बन्धनाचा अनुभव देणारी अविद्या ही दोन्हीं माझीच रूपे आहेत.
नित्यमुक्त मी आणि बद्ध- मुक्ततेत अडकलेला जीव हे दोघेही एकाच शरीरामधे नियंता आणि नियंत्रित या स्वरूपात रहातात. त्यांचे वर्णन एकाच वृक्षावर असलेले दोन जिवलग सहोदर पक्षी -- द्वा सुपर्णा सयुजा सखायाः असेच करावे लाग. त्यातील एक पक्षी त्या वृक्षाची सुखदुःखरूप फळे उपभोगत असतो तर दुसरा त्या फळांबाबत निरीच्छ, निर्विकार राहून ती फळे न खाता फक्त साक्षी भावनेने रहातो. उपनिषदातील ह प्रसिद्ध दृष्टांत उद्धवगीतेतही पुन्हा एकदा वापरल आहे.
हा ज अभोक्ता ईश्वर, तो ज्ञान, ऐश्वर्य व आनन्द या तीनही बाबतीत भोक्ता असलेल्या जीवापेक्षा श्रेष्ठ आहे. इतकेच नाही तर स्वस्वरूपाला व जगत-रूप वृक्षाला पूर्णपणे जाणत असल्याने तो नित्यमुक्त आहे. भोक्ता जीव मात्र हे जाणत नाही तोपर्यंत बद्ध आहे.
ज्या प्रमाणे स्वपनातून जागा झालेला मनुष्य त्या स्वप्नाची अयथर्थता जाणतो त्याप्रमाणे या संसाराची अयथार्थता जाणल्याने जीवही अविद्येतून मुक्त होतो, शरीरात राहूनही तो देहकर्मांनी निवध्न होत नाही. गुणागुणेषु वर्तन्त- म्हणजे आपली इंद्रिये त्यांच्या त्यांच्या गुवस्तूंना ग्रहण करणारच हे जाणून घेणारा जीव गुणांमधे अडकत नाही म्हणूनच बद्ध होत नाही.
असा जीव जरी शरीर व्यापार करत असला - उठला, बसला, जेवला, झोपला, चालला, थांबला, तरी स्वतःला त्या क्रिया कर्ता न मानता, गुणांनाच कर्ता म्हणून ओळखतो व म्हणून त्या कर्मांच्या फळापासून अलिप्त राहू शकतो. मग तो निन्दा-स्तुती, मान-अपमान, शत्रु-मित्र, असा भेद न करता अनुराग व द्वेषापासूनही निर्द्वंद्व रहातो.
जो व्यक्ती वेदाध्यायन करतो, परन्तु परमात्म्याबाबत अनभिज्ञच रहातो तो मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच हे उद्धवा, जर तू बुद्धिच्या योगाने परब्रह्माला जाणून घेण्यास असमर्थ असशील तर निदान सर्व कर्मांबाबत निष्कामभाव ठेऊन सर्व कर्मफल मला अर्पण कर. माझ्यावर श्रद्धा राखून माझ्या सर्व लीलांच नित्य गायन, कथन, भजन कर. असे केल्याने तुला माझ्या प्रति प्रेममय भक्ति उत्पन्न होईल. माझी उपासना केल्याने तुला माझे सान्निध्य प्राप्त होईल.
यावर उद्धव म्हणतो हे श्रीकृष्णा, तूच पहब्रह्म आहेस आणि तूच हा लीलापरूष, शरीरधारी श्रीकृष्ण आहेस हे मी जाणतो. म्हणून तूच मल भक्ति आणि भक्तियुक्त संताबाबत सांग. यावर श्रीकृष्णाने मदभक्त संताची लक्षणे सांगितली. माझा भक्त कृपाळू, निर्वैर, सत्यनिष्ठ, घोर दुःखातही धीर न सोडणारा, पापवासना न ठेवणारा, समदर्शी, संयमी, मधूर स्वभावाचा, अपरिग्रही, कोणत्याही वस्तूची आसक्ति न ठेवणारा, स्थिरबुद्धि, परिमित आहार- विहार घेणारा व शांत प्रवृत्तिचा असतो. तो प्रमादरहित, सम्मानाची अपेक्षा न ठेवणारा परंतु इतरांच मित्रत्व ठेऊन सन्मान करणारा असतो. मी वेदादि शास्त्रांद्वारे धर्मचरणाच्या विधी सांगितल्या आहेत परंतु जो अनन्य भावनेने माझी भक्ती करतो, त्याला या विधी-विधानांचेही बंधन उरत नाही.
हे उद्धवा, माझ्या भक्ताने कशी पूजा करावी ती माझ्या पूजेची विधाने मी तुला सांगून ठेवतो. सूर्य, अग्नि, ब्राह्मण, गाय, वैष्णव, आकाश, वायु, जल, पृथ्वी, आत्मा आणि सर्व प्राणिमात्र या माझ्या पूजास्थली आहेत. ऋक्-साम-यजु मधील मंत्रांनी सूर्यामधे माझी पूजा बांधावी. अतिथ्यद्वारे ब्राह्मणामधे माझी पूजा करावी. हिरवा चारा देऊन गाईमधे, बंधुभावाने सत्कार करून वैष्णवांमधे माझी पूजा केली जाते. निरंतर ध्यानाने हृदयाकाशात, पंप्राणांनी वायुमध्ये,जलपुष्पांनी जलामधे, गुप्तमंत्रांनी मातीमधे, आणि समदृष्टिने सर्व प्राणिमात्रांमधे माझी पूजा बांधावी. यज्ञयागादि इष्टकर्म तसेच वृक्षारोपण, कूपखनन इत्यादी पूर्तकर्मांनी माझी पूजा करावी.
सत्संग आणि भक्तियोग हे दोन उपाय कलियुगातील संसारभयाचे निवारण करतात. म्हणून हे उद्धवा, तू भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांना जाणून घे असे जरी माझे वाक्य असले तरी भक्तिमार्गाचाच प्रचार करीत देशभ्रमण कर.
------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट