मराठी बालसाहित्य

मराठी बालसाहित्य - कुठे आहे, कुठे जायला हवे
महाराष्ट्राच्या सुवर्ण-महोत्सव वर्षी मराठी महाराष्ट्राचा विचार विविध अंगांनी होत आहे. त्यांतला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बाल साहित्य. पण अजून तरी याचा विचार कुणी केलेला दिसत नाही.
साने गुरुजींनी म्हटले होते - करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. बालसाहित्याबद्दल एवढे व्यापक आणि निर्णायक, तरीही पारिभाषिक असे विधान दुसरे कुणीच केले नसेल. बालसाहित्याचा विचार फक्त बालकांसाठी साहित्य या दृष्टीकोणांतून होऊ शकत नाही - तर उद्यांचा समाज, राष्ट्र आणि जग कसं असेल किंवा कसं असायला हवं, त्याच प्रतिबिम्ब आजच्या बालसाहित्यातून दिसत असल्याने बालसाहित्याचा विचार अत्यंत दूरदृष्टीने केला पाहिजे.
मला चवथी पास झाल्यावर बक्षिस म्हणून अरेबियन नाईट्स हे पुस्तक वाचायला देण्यांत आले अणि पाचवीनंतर माझ्यासाठी चांदोबा मासिकाची वर्गणी लावण्यांत आली. या शिवाय बडील संस्कृत व तत्वज्ञानाचे प्रोफेसर आणि रिसर्च गाइड असल्याने घरांत महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं आदि पुस्तकांची रेलचेल होती. त्याच पुस्तकांच्या मुलांसाठी काढलेल्या आवृत्या पण आम्हीं विकत घेत गेलो. चांदीबा मधे ही महाकाव्य अखंडपणे वाचायला मिळत असत. वडील नोकरीसाठी बिहार मधे आले आणि आम्हीं दर उन्हाळयाच्या सुट्टीसाठी खानदेशांत येऊ लागलो, त्यामुळे इथली चुलत-मावस भावंडांची शाळेची पुस्तक हे आम्हाला ``साहित्यच`` होतं, मग तो भूगोलाचा धडा कां असेना ! आम्ही मोठे होत गेलो तसे घरांत लहान मुलांची चिकार हिन्दी मासिकं पण सुरू केली गेली - पराग, बालक, मनमोहन . . . ती आतां कालौघांत संपलेली आहेत. अमर चित्र कथा ही एक मोठी देणगीच होती.
ही मासिकं संस्कार करत होती कां ? याचं एक उदाहरण मी देऊ शकते. पराग मधे एक किशोर - कादंबरी क्रमश: मांडली गेली होती - शाळेतील सहा मुली - मुलांच टोळकं छोटया छोटया बाबतीत हेरगिरी करीत असे. एका लंगड्या भासणा-या भिका-याचा पाठलाग करतांना त्यांना एका मोठ्या कटाचा सुगावा लागतो. शहरांत शाळेतील मुलीमुलांची क्रिकेट मैच होणार असते आणि त्यांत कांही तरी अत्यंत आनंदाश्चर्यजनक होणार आहे - वाट पहा अशा घोषणा होत असतात. कटाचा माग काढतांना त्याची तारीख आणि क्रिकेट मैचची तारीख एकच असल्याच मुलांच्या लक्षांत येत. या एक मोठी मुलगी आणि एक मुलगा क्रिकेट खेळणा-या गटांत पण असतात. आयत्या दिवशी घोषणा होते चाचा नेहरू बक्षिसं द्यायला येणार आहेत. मग दुसरी धक्कादायक घोषणा - चाचा नेहरू पण स्वत: चार ओव्हर्स खेळणार आहेत. नेहरू खेळांत उतरल्यावर हेरगिरी गटामधली मुलगी खेळांत हळूच त्यांना कुजबुजून कटाची माहिती देते. मग कट करणारे पकडले जातात.
या एका कथानकाने कांय कांय नाही सांगितल? गुप्तहेरगिरी या करियर बद्दल औत्सुक्य, मुली आणि मुलांना एकत्रपणे एका टीममधे क्रिकेट खेळता येते हा स्त्रीपुरुष समानतेचा विचार - ज्याच्या अभावाने आज स्त्रीभ्रूण हत्या ही भेदक समस्या झाली आहे - आणि भारताचे पंतप्रधान थोडा वेळ कां होईना, शाळकरी मुलांमधे मूल होऊन खेळायला येतात -- या मागची मोठी लोकतांत्रिक प्रेरणा . . . !
म्हपूनच की कांय, आज वयाच्या साठाव्या वर्षी देखील माझ्या वाचनासाठी घरांत चार बाल मासिकं येतात आणि ती मी वाचते (ती दहा मिनटांत संपत असली तरी.)
माझ्यावर त्या बालसाहित्याने प्रभाव टाकला त्याची एक मोठी यादीच होईल महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं (कांही) भागवत, दुर्गा-सप्तशती, व्रत-सणांच्या गोष्टी, शिवलीलामृत हे ग्रंथ मी आधी बालवाङ्मय म्हणून वाचले. पंचतंत्र, अरेबियन नाइट्स, इसापच्या गोष्टी, ऍण्डरसनच्या परीकथा, दशकुमार चरित्र, क्रांतीवीरांच्या कथा, सर्व त-हेचा इतिहास, शिवाजी, पेशबाई, मुगल, ब्रिटिश, अरेबिया, पहिल-दुसरं महायूद्घ, आफ्रिकन महायुद्घ, फ्रेंच, अमेरिकन, रशियन व चीनी रिव्होल्यूशन, सिकंदर, चंद्रगुप्त, चाणक्य, विक्रमादित्य, चालुक्य, हर्ष, पुलकेशी, राजपूत हे सर्व वाङ्मय म्हणूनच वाचलं. तेंव्हा नव्हतं जाणवल पण आता वाटत की विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी बालसाहित्यांत मोठी कामगिरी केली त्यांचा कोषही प्रसिद्घिस यावा. त्यामधे रविद्रनाथ ठाकूर, साने गुरुजी, चक्रपाणि व बालशौरी रेड्डी (चौदा भाषांमधून निघणारे चांदोबा-- त्याचे संपादक), अनंत पै (अमर कथा मासिकाचे मालक) हरिकृष्ण देवसरे (परागचे संपादक) आचार्य अत्रे आदिंचे मोठे योगदान आहे. अत्रे यांनी संपादित केलेली शाळेच्या पहिली ते अकरावीच्या मराठी पुस्तकांची मंगलवाचन मला आजही अजोड वाटते. त्यांतले कित्येक धडे व प्रसंग मराठी भाषेची लेणी होऊन बसले आहेत. ``मी खीर खाल्ली तर बुड घागरी``, दिनूच्या आईचे बिल, `` पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा``, विसराळू विनू, ``पंत मेले - राव चढले`` ही नाटयछटा, या सर्वांमधे अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य होते - त्यांनी एक आयकॉनिक, प्रतिबिम्बाचे मूल्य मिळवले होते. या यादीत अर्नाळकरांचा छोटा गुप्तहेर छोटू पण आहे - भा.रा. भागवतांचा फास्टर फेणे आहे, टिल्लू आहे, चिंगी आहे आणि प्रभावळकरांचा वोक्या पण आहे. मात्र आज त्या धर्तीचं साहित्य हरवल्यासारखं वाटतं.
बालसाहित्य कशाला म्हणायच? त्यांत रंजकता असली पाहिजे एवढा निकष साने गुरुजींनी सांगून ठेवला. मला वाटत तेवढाच पुरेसा आहे -- इतरांना मात्र वाटतं -- बालसाहित्यांत हे असू नये- ते असू नये. उदाहराणार्थ -- एकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, अणुबॉम्ब, तत्त्वज्ञान, हे विषय बालसाहित्य असू शकत नाहीत असा आपल्याकडील खूप लेखक - प्रकाशक, चयनकर्ता आणि शिक्षण - तज्ज्ञांचा समज आहे. मला हे पटत नाही. याचे कारण मी इंग्लिश मधे लेडी-बर्ड या प्रकाशन संस्थेची पुस्तक पाहिली आहेत. त्यांनी आठ वर्षांखालील मुलांची, पंधरा खालील मुलांची आणि त्याहून मोठया मुलांची अशा तीन वर्गवारी मधे पुस्तक काढली आहेत. मुख्य म्हणजे यात कोणताही विषय बाजूला ठेवलेला नाही. त्यांच्या प्रकाशनातील पहिल्या आणि दुसच्या गटाच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकावरून मी एकॉनॉमिक्स हा विषय शिकले, एवढच नव्हे तर तोच विषय लहान मुलांना, किशोरांना आणि तरुणांना वेगळा कसा शिकवायचा आणि वेगळा कां शिकवायचा हे पण कळले. त्याच प्रमाणे साहित्य म्हणजे फक्त ललित एबढीच मर्यादित व्याख्या नाही हे पण पटले.
आधुनिकता आली तेसे साहित्य प्रकारही बदलले - खेळ, गाणी, सिनेमे, व्हिडियो गेम्स हे मनोरंजनाचे नवे आयाम समोर आले. पण यांची दखल घेण्यांत आपण संकुचित व्याख्येमुळे मागे पडलो. या आधुनिक प्रकारांना साहित्याची जोड किंवा तसे लेवल मिळालं तर त्यातून उत्तम बाल-शिक्षण होते. माझ्या लेखी लहानपणी वाचलेले जादूगार रघुवीर यांचे ``पत्यांची पोतडी`` हे पत्त्यांच्या जादू शिकवणारे पुस्तक अप्रतीम बाल साहित्य आहे. त्यांतल्या कित्येक जादू मी अजून करते. अरविंद गुप्ता यांचे टाकाऊ क्षुल्लक गोष्टीतून खेळणी निर्माण करण्याचे तंत्र, इकेबाना स्टाइलची पुष्प-सजावट किंवा कागद कातरण्याची कला हे मला उत्कृष्ट बाल-साहित्यच वाटतात. कुणी तरी बडबड गीतं एकत्रित करून त्यांना छान चाली लावून त्या गाण्यांचा आल्बम काढला - व्हिडियो चित्रफिती बनवल्या. वसंत देसाईंनी बालभारती मधील सर्व कवितांना चाली लावून महाराष्ट्रभर त्या कविता एकाच ताला-सुरात म्हणता येईल अशी सोय केली, या सर्वाचे योगदान अति मोलाचे आहे पण बाल-साहित्य म्हणून या प्रयोगांची दखल घेतली जात नाही.
अलीकडच्या काळांत जयंती नारळीकरांनी कांही प्रमाणांत बाल-वाड्मय आणि बाळ फोंडके यांनी किशोर-वाङ्मय लिहिले. पण ते विज्ञान-वाङ्मय की बाल-वाङ्मय? त्यांना कांय लेबल लावायचे या वादातच मंडळी अडकली. पण त्यांना दोन्ही लेबलं लावून, दोन्हीबंद्दल त्यांचे अभिनंदन करायला कांय हरकत आहे ?
एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर महादेवशास्त्री जोशी यांनी चार खण्डात मुलांचा संस्कृती कोष संपादित करून प्रकाशित केला, त्याबदल त्यांना पद्मपुरस्कार, महाराष्ट्र-भूषण किंवा पुण्यभूषण कां नाही मिळाले? मी स्वत: पक्षी निरीक्षण, अणु-विज्ञान, आकाशदर्शन या विषयांवर लिहिलेली स्फुटं बालवाङ्मयात मोजली जात नाहीत - ती रंजक असली तरी.
आपल्याला उद्याचा महाराष्ट्र कसा हवा आहे - इंडिया विरुद्घ भारत असा दुभंगलेला ? जो इंडियाच्या लीग मधे असेल तो फाडफाड इंग्रजी बोलणारा मराठीतून विचार न मांडता येणारा, श्रीमंत, फक्त एसी गाडयांमधून फिरणारा असा असेल -तो वैज्ञानिक, तंत्रज्ञ, हाय प्रोफेशनल -डॉक्टर, इंजिनयर, वकील, मॅनजमेंट तज्ज्ञ असा असेल. पण दुसरीकडे जो भारताच्या गटांत उभा आहे तो गरीब, आठवीच्या पुढे शाळेत न जाऊ शकलेला, शेतांत किंवा गांवात किंवा शहरांत राबराब राबणारा, मराठी बोलणारा असेल आणि या दोघांचे एकमेकांशी कांही देणं-घेणं नसेल असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे कां ? तसा नको असेल तर सर्वप्रथम रंजक पण सर्वसमावेशक अशा मराठी बाल-साहित्याची निर्मिती व्हायला हवी. संगणक आज गांवगांवात आणि शाळे-शाळेत पोचत आहे तर संगणकावर सर्वप्रथम इन्स्क्रिप्ट या अति सोप्या पद्घतीने मराठी टंकलेखन शिकण्याची व ते सॉफटवेअर फुकट मिळप्याची सोय व्हावी (कारण ते भारत सरकारचे सॉफ्टवेअर असूनही पाच ते दहा हजार एवढ्या अति महाग किंमतीत विकले जाते.) आज पोगो, हंगामा यासारखे टी. वी. चॅनेल्स मुलांसाठी चोवीस तास कार्यक्रम राबवतात. पण ते इंग्रजी, पाश्चात्य संस्कृतीत मुरलेले असे म्हणजे इंडियासाठी असतात, भारतासाठी नसतात. अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांसाठी उत्तम आणि रंजक कार्यक्रम त्यांत असतात? हे आपल्य चॅनेल्सवर मराठीतून यायला कांय हरकत आहे ?
मी केद्रशासनाच्या पेट्रोलियम कनझर्व्हेशन रिसर्च असोसिएशन या विभागाचा कारभार पहात असतांना आम्हीं शाळकरी मुलांना डोळ्यासमोर ठेऊन बरेच कार्यक्रम राबवले त्यांची थोडी चर्चा करणे मला आवश्यक वाटते. आम्ही एक साप्ताहिक रेडिया कार्यक्रम करत होतो - बूंद-बूंद की बात - या मधे पेट्रो अंकल आणि त्याचे तीन बालमित्र गप्पा आणि नाट्यसंवादाच्या रूपाने इंधनाचा प्रत्येक थेंब कसा योग्यप्रकारे वापरावा - अपव्यय कसा टाळावा - पर्यावरण कसे रक्षावे - ही चर्चा करीत असत. हा कार्यक्रम विविधभारती चॅनेलवर 250 आठवडे चालला. हिंदी खेरीज तमिल, तेलगू, मल्यालम्, कन्नड, आसामी, बंगाली व पंजाबी असे सात भाषांमधे अनुवाद करून सुमारे पन्नास आकाशवाणी केंद्रावर हा कार्यक्रम ऐकला जात असे. यातली बीस कथानक आम्हीं पुस्तक रूपाने छापली - त्यांतले दोन भाग दिल्लीच्या दोन शाळांमधे नाटयरूपाने मंचित झाले. आय.आय.टी दिल्लीच्या लार्यब्ररीने विज्ञानसाहित्य म्हणून हे पुस्तक घेतले. त्या पुस्तकांची तमिळ व तेलगू मधे पांडुलिपि पण तयार झाली .
दुसरा प्रयोग होता दूरदर्शन वर साप्ताहिक कार्यक्रम - खेल खेल में बदलो दुनिया - हा पण सुमारे 170 आठवडे चालला. यामधे देशभरांतील शाळांकॉलेजांची मुले स्वत: नाट्यप्रसंग लिहून आणत आणि पर्यावरण आणि ऊर्जा संरक्षणावर कार्यक्रम सादर करीत. शिवाय तीच मुले प्रश्नोत्तर, क्विझ यांतून आपली पर्यावरणाविषयी जागरूकता दाखवून देत. माझ्या मते हे सर्व उत्तम बाल साहित्यांत मोडते.
या शिवाय आम्ही कांही बाल मासिकांना वार्षिक कराराने एक पान जाहीरात देत असू. यातही जाहीरातीची मांडणी एखाद्या ऊर्जा संरक्षक गोष्टीच्या स्वरूपाची असायची.
या तीनही कार्यक्रमांना लहान, शाळकरी मुलांचा प्रतिसाद भरपूर होता. आमच्या कडे महिन्याभरांत दहा - पंधरा हजार पत्र, ईमेल किंवा एस.एम.एस. येत असत. मात्र शासनांतील सर्वच विभागांकडून सूर लावला जायचा - तुम्हीं ऊर्जा संरक्षणाचा विषय हाताळा - मुलांचे विषय महिला-बाल-कल्याण खात्याला हाताळू द्या - जणू कांही बालकांना ऊर्जा संरक्षणाचे देणे-घेणेच नाहीं. पण शासनाबाहेर समाजातही बाल-साहित्य ग्हणजे कांय हे ठरवतांना आपण तसाच दुभंगलेपणा दाखवत नाही कां ? माझी बदली झाल्यावर पुढील अधिका-यांनी नेमका हाच मुद्दा घेऊन, आपला व मुलांचा संबंध कांय असा प्रश्न विचारीत हे कार्यक्रम बंद केले.
बाल-साहित्यात ललित, विज्ञान, शालेय, असे भेदाभेद न करता - मराठी आणि मुलांना रंजक हे दोनच निकष ठरवून त्या साहित्याची दखल, नोंद व प्रोत्साहन हे केले गेले पाहिजे. स्वत: साहित्यिनिर्मिती करता आली नाही तरी रत्नपारखीपणा आपल्याला नक्कीच येऊ शकतो.
********************************

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट