एक शहर मेले त्याची गोष्ट

एक शहर मेले त्याची गोष्ट

सोळाव्या शतकाने डोळे उघडून आळोखे-पिळोखे दिले आणी पृथ्वीकडे नजर टाकली. एक मोठा - डोंगरपट्टा दिसला. त्यावर घनदाट अरण्य. त्यातच एक मोठा झुपका हिरडयांच्या झाडांचा - शेजारी एक छोटी वस्ती. सोळाव्या शतकाने त्या वस्तीकडे रोखून पहात म्हटले - इथे कांही तरी वेगळ घडेल.

वस्तीच्या पूर्वकडे घनदाट जंगल होत बहुतांशी हिरडयाची झाड, पण इतरही चिकार जाति होत्या मोठे वृक्ष - तीन चारशे वर्ष आयुष्य असणारे - छोटी झुडप, लता, वेली, गवतांचे किती तरी प्रकार. प्रत्येकाचे आयुर्मान निराळे. प्रत्येकाचे ज्ञान तंतु निराळे, स्वभाव निराळा.

वस्तीच्या पश्च्िामेला शेती होती. तिथे बहुतांशी बाजरी पिकायची. कधी कधी थोडी तूर, थोडे चणे, थोडे तीळ उगवले जात. शेताच्या बांधावर कुठे लिंब, कुठे बाभळी ! कुणी आंबा लावला असेल, कुणी चिंच, तर कुणी चक्क सागवान पण बांधावरच्या झाडांवर सगळया गांवाचा वाटा असायचा. कुणाला चटणीसाठी चिंच हवी असेल तर काळूच्या बांधावरुन घेऊन यायची कुणाला दात घासायला बाभळीची काडी हवी असेल तर पुढे नामदेवाच्या शेतात जायच. भाजीपाला आणी फुलं पण शेतात पिकवत नसत. प्रत्येकाच्या परसात कांही ना कांही लावलेल असायच आणी कुणालाही ते घ्यायची परवानगी असायची.

वस्तीचे मुख्य धन आणी हक्क म्हणजे हे जंगल. खास करुन सुतार आणी चांभार काम करणा-यांसाठी. शेतीचा नांगर बनवायचा असो अगर घरांत झोपण्याची लाकडी खाट, जंगलातून लाकूड आणून ही काम पुरी व्हायची. मेलेल्या गुराढोरांच चामड कमवायसाठी त्याला हिरडयाच्या पाण्यांत वारंवार बुडवून ठेवावे लागायचे. ते हिरडे देखील जंगलातूनच मिळायचे.

वस्तीचे चांभार हे चांभार कमी आणी कलाकार जास्त होते. त्यांनी तयार केलेली पायतणे विकत घेण्यासाठी दूरदूरचे व्यापारी येत. हरिया चांभाराला तर चार कोस दूरच्या राजाकडून बोलावण आल होत - राजाने त्याला खास सम्मान दिला होता. तेंव्हा हरियाच वय असेल पंचवीस - सत्तावीसच्या आसपास. राजाने विचारल होत - चप्पलांवर इतकी मेहनत, इतकी कलाकुसर कशी कांय करतोस? तू बनवलेली पादत्राणं इतकी मऊ असतात, जणू कांही कुणी ऊवदार कापडाने हल्के हल्के पाय दाबावेत. कस करतोस हे ? कोण शिकवत तुला ?

हरियाने पळभर डोळे बंद केले तर हिरडयांचे जंगल त्याच्या डोळयांपुढे नाचू लागले. त्याने उत्तर दिले - महाराज, आम्ही जंगलात जातो. या झाडांकडूनच शिकतो चामड कस कमवायच, त्याला नरम, मुलायम कस बनवायच. राजाने म्हटले तर मग ध्यानात ठेवा - तुमच जंगल नेहमी हिरवगार रहाव.
----------------------------------------------- ज््र ---------------------------------------------

त्या गोष्टीला होऊन सुद्धा वीसेक पावसाळे गेले. आज हरिया वस्तीतल्या जुन्या आंव्याच्या खाली बसलेला आहे. सगळ्यांना इथेच यायच नियंत्रण पाठवल होत त्याने. थोडया वेळाने लोक जमा होतील. तो पर्यंत हरिया मनातल्या मनांतच आपले शब्द उलट - सुलट फिरवतोय्‌ त्याला कांय म्हणायचे आहे ते त्याला स्वतःच नीटस कळलेलं नाही. तर मग गांववाल्यांना तो कांय सांगणार ? त्याला म्हणायचं होत की गांवात आता लोक वाढलेत. त्याना शेताच उत्पन्न पुरेना झालय्‌. जंगलातून जी कंदमुळ, जाम, करवंद, उंबर आदि आणली जायची

- ती देखील कमी होऊ लागली आहेत. गांवक-यांना हे कळत नसेल अस नाही. याच आंब्याखाली बसून गांवाने ही चर्चा आधी केलेली आहे. मग हरिया आज नवीन कांय सांगणार आहे ? त्याला स्वतःच ठाऊक नाही.

वस्तीवाले गोळा झाले तसे हरियाने उठून आधी आपल्या वडिलांना आणि मग रामधन बाबांना पायाला हात लावून नमस्कार केला. तिथून आपल्या जागेवर परत येईपर्यंत एवढा वेळ जमवून ठेवलेले सगळे शब्द हरवून गेले. कोणतीही भूमिका न मांडना त्याने एकदम घोषणा करुन टाकली - मी ही वस्ती सोडून नवीन गांव वसवायला बाहेर पडत आहे. इथल जंगल, जमीन आणी शेती कमी पडत चालली. आता नवीन जमीन शोधावी लागेल. बोला, माझ्या बरोबर कोण कोण येणार ?

-------------------------------------------- न् ------------------------------------------

जाण्यची तयारी पूर्ण झाली होती. नेतृत्व ओघानेच हरियाकडे आल होत. एकूण चाळीस परिवार चालले होते - त्यातले अठंरा तर चांभारांचेच होते. ते आपल्या बरोबर कांही ढोरं पण घेऊन जाणार होते. म्हणजेच आता काहींना चांभारकीचे कांम सोडून गुराखी धनगर आणी मेंढपाळांचे काम शिकावे लागणार होते. कांहीना शेती पिकवावी लागणार होती. तशी सात शेतकरी कुटुंबही सोबत निघाली होती. पाच सुतार कुटुंब होती - बाकी इतर.
-------------------------------------------- न् -------------------------------------------------

रात्री मधुकर आला - हरिया, माझ्या आईने निरोप दिलाय्‌ - आताच तिला जाऊन भेट.

मधुकर गांवाच्या वैदू होता. त्याचे वडील लहानपणीच वारलेले. आईनेच त्याला वाढवले होते आणि वैद्यकी शिकवली होती गांवात कुणाला ताप आला, जखम झाली, साप - विंचू चावला तर लोक येऊन मधुकरच्या आईला आणि आता मधुकरला विचारत. दूरच्या वस्त्यांवरुन देखील लोक येत कधी - कधी आपल्या आजारी गुरांना पण घेऊन येत.

मधुकरच्या आईने बोलावल आहे म्हणजे नक्की कांही तरी खास बात असणार. हरिया लगेच उठून मधुकर बरोबर निघाला.

दोन- तीन पणत्यांच्या उजेडात मधुकरची आई समोर कित्येक मुळया आणी खोड पसरून बसली होती. हरिया येताच ती म्हणाली - काय रे, जायची तयारी पूर्ण होत आली अस ऐकते.

हो मधुकरची आई. तुला आठवत का? एकदा आपल्या गांवात एक नट आला होता - रामायणातल्या पात्रांचा अभिनय करुन पोट भरायचा. त्यानेच नव्हत का सांगितल की पश्च्िामेकडच्या कळंबी गांवातली एक बस्ती निघून त्यांनी दुसरीकडे गांव वसवल होत. आपली ही वस्ती पण अशीच येऊन वसली होती की नाही? पण आता इथल जंगल आणी शेती अपुरी पडायला लागली म्हणून मी ठरवल की दुसरी वस्ती वाढवायची.

ते ठीक आहे. म्हणून मी तुझ्यासाठी या मुळया आणि बिया बाजूला काढल्या आहेत. दुसरी वस्ती निवडशील तेंव्हा तिथल्या जंगलात जाऊन यांची ओळख करुन घ्यावी लागेल. नाही तर येता जाता कुणी आजारी पडल, ढोर मरु लागली तर कांय कराल?
हरियाच्या डोळया समोर पुढची वीस वर्ष झर्रकन्‌ फिरली. मनांत एक वेगळाच विचार आला.

मधुकरची आई, थांब या सगळया मुळया आणी झाडपाला इथेच राहू दे या मधुकर साठी. तूच आमच्या बरोबर चल नव्था वस्तीवर.

हे कांय बोलतोस हरिया ? मधुकर इथे एकटा पडेल ना !

नाही काकी - त्याने आपल्या साठी पाहिली आहे कुणीतरी ! काय रे मधुकर, तुझ आणि कोमलच जमलय ना? तुम्ही दोघ याच पावसाळ्यानंतर वेगळी झोपडी करायची म्हणताय्‌ ना. मग तुम्ही दोघ तिकडे आणि काकी इकडे एकटी या झोपडीत. त्यापेक्षा येऊ दे आमच्या बरोबर ! इथली वैद्यकी तू पहाशील. आमच्या नव्या वस्तीची वैद्यकी तुझी आई बघेल.
------------------------------------------ ज््र --------------------------------------------------
नव्या वस्तीसाठी निघायला अजून पंधरा दिवस होते. मधुकरची आई त्याला जंगलात घेऊन गेली. जंगलात पाण्याचे तीन ओढे होते - बहुतेक वेळी बारमाही पाणी गुडघाभर वहायचे. त्यातल्याच एका ओढया पलीकडे दोघ गेली. तिथे एक करवंदीची जाळी होती. त्याच्या पलीकडे म्हातारा वड ।

त्याला म्हातारा वडच म्हणत. कारण त्याच्या इतक्या पारंब्या होत्या की मोजण अशक्यच. त्याच्याही पलीकडे कमरेइतक वाढलेल एक नव्या जातीच गवत होत. त्यावर बारीक बारीक पिवळी घम्मक फुल डोलत होती.

मधुकर आणि आईने म्हाता-या वडाला हात जोडले आणी त्याच्या खाली निवांत बसले. पलीकडील पिवळया फुलांकडे बोट दाखवत मधुकरची आई सांगू लागली.

ऐक, ही खूप जुनी गोष्ट आहे. तेंव्हा माझे वडील या जंगलात येत असत. त्यांना झाडांशी कस बोलाव ते ठाऊक होत. म्हणूनच ते गांवात वैद्यकी करु शकत होते. मी पण लहानपणापासून त्यांच्या सोबत जंगलात येत असे. कंदमुळांची ओळख करुन घेत असे.

एकदा गांवात एक विचित्र महामारी पसरली. लोक तापाने फणफणत. त्यातच वांती होत होती आणी नाक - डोळे वाहू लागत. मग ताप वाढायचा आणी माणूस पटकन्‌ मरून जायचा. एक एक करुन तेवीस माणस या आजारात मरण पावली. ते वडिलांकडे येऊन रडत. वडीलही हताश होते. रोज जंगलात येत. या म्हाता-या वडाला हात जोडत. बाबा रे, तू इतकी वर्ष, इतके ऋतु पाहिलेस, या गांवच्या कित्येक पिढया तू पाहिल्यास. त्यांचे रोग, शोक, संताप पाहिलेस. या महामारी विरुद्ध लढायचे ज्ञान तुझ्याकडे कुठेतरी जपून ठेवले असशील. तुझ्याकडे नसेल तर तुझ्या वृक्ष जातीकडे असेल. ते ज्ञान भांडार उघड आणि या रोगावर उपाय दाखव. मार्ग दाखव. नाही तर एक एक करुन सर्व माणस मारतील. ही वस्ती उजाड होईल. तूच सांभाळ !

मी रोज तुझ्या जवळ येईन आणी तुला उपाय विचारीन. हे जंगल तुझ आहे, तशी ही वस्ती पण तुझीच आहे. वस्ती वाचवण्याची जबाबदारी पण तुझीच आहे !

मधुकर आश्चर्याने ऐकत होता - अस आजोबा बोलू शकत होते झाडांशी ? मग पुढे कांय झाल ?

बाबा सांगतात - एका रात्री वडाच्या झाडाने इतर झाडांबरोबर चर्चा केली. हा आजार कांय आहे? इथल्या वस्तीच्या माणसांना का जडलाय्‌ ? त्यावर उपाय कांय आहे ? कुठ-कुठल्या झाडा - झुडपाजवळ किंवा गवताजवळ किंवा वेलींजवळ हा रोग थोपवणारे प्रभावी तंतु आहेत ?

त्या रात्रीच्या सभेत सर्व झाडांनी आपापल्या बुंध्यामधे साठून राहिलेली ज्ञान भांडारे उपसून पाहिली. कुणाजवळ पन्नास वर्षां पासून साठलेले ज्ञान तंतू होते तर कुणाजवळ शंभर वर्षांचे. स्वतः वडाजवळ फक्त ऐंशी वर्षांचे साठलेले ज्ञान तंतु होते. पण अगदी पश्च्िामेच्या कोप-यावर एक अडीचशे वर्ष वयाचे झाड होते. त्याला माहीत होते या आजारावद्दल. त्याला माहीत होते की कुठल्या झाडांचे प्रभावी तंतु एकत्र करायची गरज आहे. त्याच्या सूचनेवरून त्या त्या झाडांनी आपले प्रभावी तंतू देऊ केले. आणी हे समोर दिसणारे गवत तयार झाले. आधी हे गवत जंगलात नव्हते. बाबा सांगतात की या गवताच्या गरापासून त्यांनी नवीव औषध तयार केले आणी ती महामारी आटोक्यांत आणली.

मधुकर अवाक्‌ एकत होता. त्याला आपल्या आजोबांच्या नोंदवहीत लिहून ठेवलेल एक वाक्य आठवल - 'जिथे जो आजार असेल, तिथे जवळच्याच झाडा- झुडपांकडे त्याचे औषध पण असते.'

त्याची आई सांगत होती -- तेव्हापासून तुझ्या आजोबांच्या वैद्यकीची चर्चा दूर दूरच्या गांवापर्यंत होऊ लागली. आजही माझ्याकडे येणारे लोक मला त्यांच्या जागी मानून त्याच श्रद्धेने येतात.

'आणी ती महामारी ? मी तर गांवात कधीच महामारी नाही पाहिलेली?' मधुकर ने विचारले.

'खर आहे. ती महामारी गांवात पुनः नाही आली. माझ्या वडीलांच्या काळात नाही आणी माझ्या काळांतही नाही. पण कोण जाणे, तुझ्या काळांत कदाचित येईल. किंवा आता हरिया दुस-या ठिकाणी वस्ती करायची म्हणतोय्‌ तर तिथे येऊ शकते.'

'आणी तिथल्या जंगलांमधे हे गवत नसेल तर ? म्हणूनच तुला इथे घेऊन आले आहे. आज इथे या गवताच बी धरु या. ते मी तिकडच्या जंगलात नेऊन लावीन.'

'आई, फक्त बी नको टाकू. कुणाला तरी नीट समाजावून पण ठेव.'


हो रे हो । आता मला त्या नव्या वस्तीत एक नवा मधुकर तयार करायचा आहे.

आणी आई, ज्या झाडाने वडाच्या सांगण्या वरुन आपले ज्ञानतंतू तपासून आजाराचे औषध ठरवले होते, ते जुन झाड कुठे आहे?

माझ्या बाबांनी मला ते झाड दाखवल होत. पण मला वाटत त्यांच आपापसात कांही तरी नात निर्माण झाल असाव. बाबा गेले त्यानंतर कांही दिवसांती ते झाड हळूहळू सुखून गेल. मग एकदा जंगलात वणवा
पेटला - त्यात ते होरपळून गेल.

मग आता आपल्या जंगलात जुनी झाड कोणकोणती शिल्लक आहेत ?

एक तर हा वडच आहे. पण बाबा सांगत की चौथ्या झ-याजवळचा शीशम सगळयांत जुना असावा. तिकडेच तीन चार ओक आहेत ते पण जुनेच आहेत.
मधुकर, जुन्या झाडांकडे विशेष लक्ष दे. त्यांनी आपल्या कित्येक पिढया पाहिलेल्या असतात. आपली सुख-दुख, जरा, व्याधि, त्यांना कळत असते. त्यावर ती सतत उपाय शोधत असतात. आपल्याला त्यांची भाषा समजत नाही म्हणून, नाहीतर किती फरक पडला असता?
---------------------------------------------------------------------------

पंचवीस वर्ष लोटली. हरियाला ते अशासाठी लक्षात आहे की ते वस्तीहून निघाले होते तेंव्हा लक्ष्मण च्या झोळीत त्याच दोन महिन्याच मूल होत. तो चंदन आता पंचवीस वर्षांचा झाला आहे. त्याच्याच नावाने या वस्तीच नावही ठेवल - चंदरपुर. लक्ष्मण आणी तानी तर त्याचे आईवडीलच आहेत. पण चंदरला खरा लळा आहे तो मधुकरच्या आईचा. जसा कृष्ण बाळाला यशोदेचा लळा असावा तसाच. तिने त्याला जंगलात नेऊन वैद्यकी पण शिकवली आहे.

महामारीवर वापरण्याचे ते पिवळया फुलांचे गवत चंदर आणि मधुकरच्या आईने जंगलात खास जतन केले आहे.

चंदरपुर गांव वसवायच्या आधी हरिया, लक्ष्मण आणि मधुकरच्या आईने आसपासचे कित्येक कोस क्षेत्र तपासले होते. चाळीस परिवारांना वसवण्यालायक मोकळी जमीन तयार करायची होती - कांही झाड तोडावी लागणार होती. मग त्या क्षेत्राच्या राजाकडून गांव वसवण्याची, शेती करण्याची आणी जंगल वापरण्याची परवानगी घ्यावी लागणार होती. त्यासाठी हरिया आणी लक्ष्मण राजाकडे गेले होते. शेतीचा किती कर राजाला दिला जाईल आणी जंगलाचा किती हिस्सा गांवाला वापरू दिला जाईल ते ठरल्यानंतरच राजाची आज्ञा मिळाली. पण राजा तेवढयावरच संतोषला नव्हता. त्याने विचारले होते -- तुमचे चाळीस परिवार आहेत, त्यांना हुनर कांय कांय आहे? त्यामुळे राज्याचा काय लाभ आहे ते सांग ।

हरियाचे कौशल्य पुनः एकदा आपली जादू दाखवून गेल. त्याने मोठी मेहनत घेऊन बननलेली चपलांची जोडी उलगडून राणीच्या पायांसमोर ठेवली. लक्ष्मण भातापासून बारीक पोहे तयार करण्यांत पटाईत होता. त्याने पण आपली पोह्यांची पिशवी राजा समोर उघडून ठेवली.

हं। शेतकरी आणी चांभार ! बरच कौशल्य दिसत तुझ्या कामात ! राजाने चपलांच्या सुंदर जोडाकडे पहात विचारले -- आणखीन कोण कोणती कला आहे तुमच्या लोकांमधे ?

एक सुखीराम आहे तो बांबूची काम करतो, आणी एक म्हातारी मधुकरची आई आहे ती वैद्यकी करते. ती झाडांशी बोलू शकते, महामारीच औषध शोधून काढू शकते.

चाळीस परिवारातीत प्रत्येकाच्या कलेची आणी कौशल्याची माहिती लिहून घेतल्यावरच मंत्र्याने त्यांना गाव वसवायची परवानगी दिली होती. दोन दिवस राजनगरीतच घालवावे लागले होते.

पण आता गांव पूर्णपणे वसले आहे. पंचवीस वर्षातच परिवारांची संख्या तीनशेच्या वर गेली आहे. इतर
कित्येक गावातले एकटे दुकटे परिवार या गांवात वस्तीला आले. त्यांच्या कला-कौशल्या मुळे चंदरपुर एक व्यापारी पेठेचे गांव बनले.
-----------------------------------------------------------------------------------
चंदर बारा वर्षांचा होता तेंव्हाची गोष्ट. हरिया आणी मधुकरच्या आईला राजाकडून बोलावण आल होत. चंदर पण गेला होता. तिकडच्या एका गावात महामारी आली होती. शरीरावर फोड निघायचे मग ताप यायचा. मग फोड फुटून पू निघायचा, ताप वाढायचा आणी पहाता पहाता रोगी दगावायचा. चार ते आठ दिवसातच सगळा खेळ खलास होत असे.

मधुकरची आई आणी चंदरने आसपासची सगळे जंगल पिंजून काढले. मधुकरची आई प्रत्येक जुन्या झाडाजवळ जायची पाहिलेल्या प्रत्येक रोग्याचे सगळे वर्णन त्या झाडांना ऐकवायची. दर संध्याकाळी निराशेने मान हलवत म्हणायची -- उशीर लागेल. कुठल्याच झाडाला माहीत नाही या महामारी विषयी.

पण महित्याभरातच त्यांनी पाहिलं -- जंगलात कडुलिंबाची बरीच रोप उगवली होती. एरवी या जंगलात कडुलिंब जवळ जवळ नव्हताच. तर मग कांय महामारीचा उतारा या झाडांपाशी होता? मधुकरच्या आईने नियम ठरवून टाकला -- प्रत्येक रोग्याने या रोपांच्या आसपासच रहायच. या एकाच उपायाने महामारीचा प्रकोप कमी झाल्याच चंदरने पाहिल होत. तेव्हा पासून या क्षेत्रातही मधुकरच्या आईची ख्याती पसरली होती.
-------------------------------------------- -------------------------------------------------
सतराव्या शतकाने आळोखे पिळोखे दिले.

चंदरची पंचावन्न वर्ष उलटून गेली होती तेंव्हाची गोष्ट. रोजच्या प्रमाणे तो जंगलात आला होता. तिथल्या अगदी जुन्या अगस्तीच्या झाडाखाली बसून तो त्याला रोज गावचा हालहवाल ऐकवायचा.

गेल्या कांही दिवसांपासून गांवात एक विचित्र रोग पसरला होता. आजारी माणसाच्या तोंडातून लाळ टपकायची. डोळ्यांतून पाण्याबरोबरच घाण पण बाहेर यायची. सहाआठ दिवसांत आधी हातपाय, मग मान थरथर कापू लागत. त्या कंपामुळे रोगी जर्जर होऊन थंड पडू लागायचा. त्यातच उचक्या लागून त्याचा प्राण जायचा.
चंदर ने अगस्ती जवळ बसून हा आजार ऐकवला. त्याच्या पाचव्या दिवशीच पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या बिम्बातून अमृताचा वर्षांव होत होता आणी त्याच्या रसात प्रत्येक झाडाचे कण न कण फुलून येत होते. मंद हवेत झाड डुलत होती. त्यांच्या पानांच्या हालचालीने हवेत लहरी निर्माण होत होत्या. या लहरी एकमेकांत मिसळत होत्या. त्यांच्या माध्यमातून झाड एकमेकांना स्पर्श करीत होती. त्या लहरीनी एक वेगळा झणकार, एक नाद निर्माण केला होता. आता प्रत्येक झाड एकमेकाशी बोलू शकत होत, समजू शकत होत.

प्रत्येक झाडाची चेतना एकच प्रश्न विचारीत होती आणी तो प्रश्न अगस्तीच्या झाडासाठीच होता -- . चंदरच्या लोमकूप आणी केसांकडून आम्ही ऐकलेला हा नवा आजार कोणता आहे ? त्याचा प्रतिकार करणारे प्रभावी तंतु कोणकोणत्या झाडांकडे आहेत ? एखाद्या असलेल्या प्रजातिकडेच या रोगाचा उपाय आहे की नवीन प्रजातिचे सृजन करावे लागेल ?

अगस्तीच्या जोडीला जंगलात एक जुना सोम वृक्ष पण होता. दोघांनी आपापल्या बुंध्याच साठवलेले
ज्ञानतंतू बाहेर काढले आणी तपासू लागले. त्याच वेळी दूरदूरच्या जुन्या जाणत्या झाडांकडून आलेल्या लहरींनी देखील त्यांच्या ज्ञानतंतू मधे साठलेली माहिती पुरवली. प्रत्येक चेतना बिंदु व त्यातील बारीक-सारीक माहिती
सर्व झाडा - झुडुपांनी, लता - वेतींनी, गवतांनी ग्रहण केली, त्यांत आपली भर घालून उपायाचा शोध सुरु झाला.

या सर्व मंथनातून चार ज्ञान तंतू वेगळे काढले गेले. ते घेऊन एक नई प्रजाति तयार होईल. ते एक जमीनीसरशी सपाट वाढणारे गवत असेत. त्याच्या मुळातून या नव्या महामारीवर असलेले औषध निर्माण होईल या नव्या गवताचे नांव ठरले -- असोका. त्याला जमीनीतून उगवायला देखील आठ - दहा दिवस लागतील. मग त्याला जनावरांपासून वाचवावे लागेल. याची जबाबदारी पडली बाभळींवर त्यांनी आपले काटे वापरुन या नव्या गवताला संरक्षण द्यायचे. मग कुठे महिन्यानंतर ते गवत रोगावर उपायासाठी तयार होईल.

असोकाने आपल्या सोबतच्या इतर गवतांकडून आणी झूडुपांकडून त्या चेतना संगमाची कहाणी तेवढी ऐकली आहे. कसा असतो चंद्रप्रकाशात होणारा झाडांचा चेतना संगम? कधी कधी करतात तो संगम? असोकाला कधीच पहायला मिळला नाही. त्याचे आयुष्य तरी केवढेसे ? उगवून वी धरुन ते जमीनीत पडून जायला फक्त दोन महीने पुरत. मग ते बी उगणार एकदम पुढच्या वर्षी. ग्क्ष्च्च्क्ष्ग़्क्र आता ते अगस्ती आणी सोमचे झाडही उरलेले नाही. कित्येक वृक्षांच्या प्रजातीच संपत गेल्या आहेत. त्या बरोबरच किती तरी पशुपक्ष्यांच्या देखील. असोका स्वतः सुद्धा आता पर्यंत अडीचशे वेळा झोपून पुनः उठलेले आहे. म्हणजे माणसांच्या भाषेत अडीचशे वर्ष जुने आहे. इतकी वर्ष त्याने त्या लाळ टपकवणा-या महामारीच्या विषाणूंना थोपवून धरल आहे. पण ते एकटं किती वर्ष तग धरणार ? जवळपासचे जुने जाणते वृक्ष माणसांनी कापून काढले आहेत. त्यांच्या जवळ जेवढी माहिती आहे ती साठवून ठेवण्यासाठी ज्ञानतंतूचे भांडार असलेला मजबूत बुंधा असोकाकडे नाही. त्यासाठीच मोठे वृक्ष पाहिजेत. तेच चेतना संगमात येणा-या लहरींना आपल्या बुंध्यात साठवून ठेऊ शकतात. तिथेच ती माहिती सुरक्षित राहू शकते. पण माणसाला हे एवढ सोप्प असूनही कळत कस नाही?
-------------------------------------------- -------------------------------------------------
गेल्या तीनशे वर्षांत चंदरपुर गावांत हजारो प्रकारांनी परिवर्तन झाले. पण त्या सगळयांना एकच परिवर्तन म्हणजे योग्य ठरेल. त्याचे नांव अफाट वाढ ! मागे विशाल डोंगार आणि दोन नद्यांच्या संगमावर असलेले हे गांव राजधानीचे शहर झाले. इथे लढाया लढल्या गेल्या. इथून राज्यकारभार झाला. व्यापारी केंद्र तर हा होतेच. पण देशाची शैक्षणिक राजधानी म्हणून देखील गजबजून गेले. विस्तार आणि विस्तार हीच चंदरपुरची ओळख होऊन बसली.
-------------------------------------------------------------------------------------------


विसाव्या शतकाने आळोखे पिळोखे दिले. आणी चंदरपुरकडे डोळे रोखून पाहिले. आता चंदरपुर हे देशाचे आर्थिक केंद्र बनत होते. राज्यकारभारची भाषा इथे घडत होती आणी इतरत्र बोलली जात होती. समाज व्यवस्थेतही कित्येक बदल झाले. आता राजे राजवाडे गेले - त्यांच्या जागी परक्यांची सत्ता आली. पुढे तीही गेली आणी लोकशाही आली. घर बांधणीचे तंत्र बदलले. बांबूच्या झोपडयांऐवजी विटा आणि सिमेंटची पक्की घर उभी राहिली. पायवाटा किंवा गाढवांच्या मालवाहतूकीचे रस्ते बदलून डांबरी रस्ते आले. जाति व्यवस्थेतील एकात्मता जाऊन भेदभाव आणी शोषण व्यवस्था लागू झाली. यात सुखीराम सारख्या सुताराच्या किंवा हरिया सारख्या चांभाराच्या उत्कृष्ट कारागिरीला कांही महत्व नव्हते. प्रयत्न होते ते त्यांना चामडयाचे काम करतो म्हणून हिणवण्याचे आणि समाजाच्या अर्थव्यवस्थेत जातीच्या आधारावर त्यांचे महत्व नाकारण्याचे. आता
शिकण्यासाठी सुद्धा लोक झाडांपाशी जात नसत. आता शाळा क़ॉलेजात जात असत.

झाडांनीही आता माणसांच ऐकून घेण बंद केल होत. पण त्यांच्या चेतना संगमामधे अजूनही माणसाला आणी पशूपक्ष्यांना होणार्‍या आजाराची चर्चा होत असे. रोगनिवारक प्रजाति निर्माण कराव्या लागल्या तर त्याला आवश्यक ज्ञान तंतूची शोधाशोध व चाचपणी होत असे. ज्या झाडाझुडपांजवळ ते असतील त्यांच्या कडून घेऊन नवीन प्रजाति निर्माण केल्या जात होत्या, जेणे करुन प्राणीसृष्टीत रोगराईचे प्रमाण कमी व्हावे. झाडांनी आपला धर्म सोडला नव्हता. पण समस्या ही होती की त्यांचे ज्ञान व नवे आविष्कार मनुष्यापर्यंत पोचवायचे कसे?

---------------------------------------------------------------------------------------------
एकविसाव्या शतकाने आळोखे पिळोखे देत चंदरपुरकडे बघितले आणि म्हटले -- अरेरे ! हे कांय होऊ घातलय्‌ इथे ? पण काळाच्या त्या तुकडयाला पुढे काहीच करायचे नव्हते.

चंदरपुरला आता देशाची तिसरी राजधानी म्हणत. शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक प्रगति. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधे देशांत नंबर वन ! चाळीस परिवारांनी वसवलेल्या कसब्याची लोकसंख्या आता चाळीस लाखांच्या घरांत पोचली होती. दूर दूर पहावं तिकडे उंच उंच, दहा - वीस मजली इमारती, शॉपिंग आर्केड्स, पक्के रस्ते, त्यांच्यावर धावणा-या नव्या बसेस आणी आधुनिक वाहने. समुद्राच्या अथांग लाटां प्रमाणे येणारे जाणारे लोक.

आणी लोक म्हणू लागले - ओफ्फो ! लोकसंख्या इतकी वाढली पण रस्ते अजून तेच पन्नास वर्षांपूर्वीचे अरुंद ! अरे, कुणी तरी यांना रुंद करा रे। महानगरपालिकेच्या भव्य अट्टालिकेत बैठक झाली -- रस्ते रुंद करा - प्लान तयार करा - एस्टिमेट बनवा - झटपट !
नगर विकास विभागाचे सर्वेयर दौडत सुटले. रस्ते रुंद करायचे आहेत. झांड कापावी लागतील. मोजा रे किती झाड कापावी लगतील ते.

कांही लोकांनी ही आदेश ऐकला. पुन्हा कान देऊन ऐकला. अरे, कांय म्हणताहेत हे ? झाडं कापून काढणार? कुठल्या रस्त्याबद्दल चाललीय्‌ चर्चा? अरे, तिकडल्या त्या रस्त्याची? पण त्यावर तर खूप जुनी सुदंर झाडं आहेत ! हो, दोन-तीनशे वर्षे वयाची. आणी फर्ग्युसन या कॉलेज रोड वर पण झाडं कापणार ? आणी त्या तुकाराम - पादुका रोडवर पण कापणार? छे, काही तरी चुकतय्‌.

एकविसाव्या शतकातील माणसाला झाडांबरोबर संवाद साधता येत नव्हता. पण काही माणसांना झाडांची चेतना स्पर्श करून जात असे. त्यांच्यात एक आगळी संवेदना निर्माण होत असे. पण पुढे कांय करायचे, संवेदना कशी जोपासायची, वाढवायची, झाडांबरोबर संवाद कसा साधायचा ते कळतच नसे. मग त्यांच्या मनांत कांही तरी खळबळत असे.

चंदरपुर मधे सुद्धा अशी कांही माणस एकत्र आली. ती म्हणाली - झाड कापू नका. त्यांच्या पलीकडून रस्ता न्या आणी रुंद करा. झाडांचा वापर रोड डिव्हायडर सारखा करा. त्यांना जगू द्या.

मग थोडया सभा झाल्या. नारे झाले. थोडे लेख छापून आले. थोडया रैलीज पण झाल्या. पण महानगरपालिकेवर दबाव येतच होता - वाहनं इतकी वाढली आहेत. ती चालवायला रस्ते हवेत. झाडांनी
उगीचच जागा अडवून माणसाची अडचण केली आहे. रस्ते द्या - झाडं नकोत, रस्ते द्या - झांड नकोत !

एक एक करून चंदरपूरचे सगळे रस्ते रुंद झाले. एक एक करून चंदरपुरतील रस्त्याच्या कडेची
सगळी आयुष्मान झाड कापली गेली. त्या एका वर्षांत चंदरपुर महानगरपालिकेने पन्नास पेक्षा जास्त वय असलेली. सुमारे सात हजार झांड कापून काढली. त्यांना कापून जे रस्ते रुंद झाले त्यांची लांबी होती सुमारे दोनशे किलोमीटर.

असोका आणी त्याच्या सारख्या छोटया गवताच्या आणी झुडपांच्या कित्येक प्रजाति त्या रस्त्यांखाली दबल्या गेल्या. त्यंच्यावर रेती, माती, दगड, विटा, डांबर आणि सिमेंट येऊन पडले. त्यात त्यांचा जीव गुदमरून गेला.
असोका चे बी पण गुदमरले ।
------------------------------------------------------------------------------------------
इ. सन्‌ २०१० च्या मार्च ची एक सकाळ ! चंदरपुरात लाळ टपकणारी महामारी पुन्हा एकदा पसरली. लोकांच्या हाता, पायांना, बोटांना कंपवू लागली. मग त्यांची मान थरथरु लागली. रुग्णालयात रोग्यांची संख्या वाढू लागली. या रोगाला थोपवण्यासाठी जगभरातले प्रसिद्ध वैज्ञानिक चंदरपुरकडे धावले.

तिकडे पक्ष्यांच्या जगात पण खळबळ माजली. सतर्क रहाण्याची सूचना सर्वांना मिळाली. अशा रोगाने मरण पावलेल्या माणसाच्या शवापासून दूर रहा. त्या शवावर चोच मारु नका.

चंदरपुर मधे जेवढी झाड आणी वनस्पति शिल्लक होत्या, त्यांनी आपल्या लहरी पसरवून पुन्हाः एकदा चेतना संगम करण्याचा प्रयत्न केला. पण आता सगळी झाड एकमेकांपासून खूप लांब लांब होती आणी अनुभवाने कच्ची होती. त्यांच्या मधे संपर्क प्रभावी होण्यासाठी पूर्वी साधे गवत देखील कामी लागायचे - आता जमीनीवर फारसे गवत व छोटी झुडप पण राहिली नव्हती. झाडांकडे असलेल्या पातळ बुंध्यांमधे अजून म्हणावे तितके ज्ञानतंतू जमले नव्हते. आता कुठल्याही वृक्षाला किंवा झुडपाला पुन्हा असोकाचे सृजन घडवून आणणे शक्य नव्हते. महामारी वाढत गेली. माणसाला खात गेली.
-------------------------------------------------------------------------------------------
सन्‌ २०११ च्या मार्च ची एक सकाळ ! आज चंदरपुरातील प्रत्येक माणूस शहर सोडून निघून गेलेला होता - दुस-या शहरांत नाही तर मृत्युच्या दारांत ! चंदरपुर आता फक्त बहुमंजली इमारती आणी सिमेंटच्या रस्त्याच शहर राहिल होत !

हरियाच चंदरपुर मरण पावल होतं !
------------------------------------------ ---------------------------------------------------

मध्ये खूप वर्ष गेली. आता देशांत एक नवी संस्था चर्चेत होती. जैवविविधता जपणूक जत्रा, थोडक्यात तिला जैजज म्हणत. शाळेच्या मुलांची सहल काढणे व त्यांच्या मार्फत देशांतील विभिन्न भागांच्या जैव - विविधतेचा अभ्यास करणे, दुर्मिळ जाती शोधणे, हे संस्थेचे काम. त्यांना हरडयाचा शोध घ्यायचा होता.

एका लेखकाच्या हस्तलिखित संग्रहात हरियाची गोष्ट होती. तो वारला तेंव्हा हा संग्रह एका रद्दी विकणा-याकडे पोचला. त्याची मुलगी जैजज ग्रुपच्या सहलींना जायची. म्हणून त्याला वाटले - हे कागद तिला महत्वाचे असतील. अशा त-हेने हरियाची गोष्ट जैजज पर्यंत पोचली.

मग एक दिवस रंगीबेरंगी पोशाख घालून हजारो मुल मुली चंद्रपुरला आली जणू फुलपाखरच कुणाच्या हाती चित्र काढलेले फलक होते तर कुणाकडे चित्रं, कुणाकडे रोपं, कुणाकडे पाणी, कुणाकडे कुदळी.

पुनःएकदा शहर - मोजणी तज्ञ आले त्यांनी खणाखुणांवरुन ओळखले - हेच जुने चंद्रपुर. याच त्याच्या पंचक्रोशिच्या खाणाखुणा. करा रे सुरुवात.

ढोल-लेझिम च्या तालावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरु झाला. लाखो-बिया, हजारो- रोप लावली. मध्यभागी जैजजला सापडलेले एकुलते एक हिरडयाचे रोज पण लावले. आणि अशोका - त्याचा शोध लागला नाही. पण ही झाडे मोठी होतील. खूप खूप वर्ष जगतील. पिढयान्‌ पिढया माणसांचे रोग पहातील आणि त्यांच्या औषधांची माहिती आपल्या ज्ञानतंतुंमध्ये साठवून ठेवतील. त्यांचे चेतना-संगम भरतील. गरज पडेल तेंव्हा प्रभावी ज्ञानतंतू एकत्र आणून रोगराई नष्ट करणा-या प्रभावी वनस्पतिंची वाढ करण्याचे वृक्षांचे काम चालूच राहील.

---------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे