भारतीय तत्त्वज्ञानातील अनुभवसिद्धता महत्त्वाची -- लीना मेहेंदळे

भारतीय तत्त्वज्ञानातील अनुभवसिद्धता महत्त्वाची -- लीना मेहेंदळे
Maharashtra Times Pune 23 May 2018
टॉकटाइम (--चिंतामण पत्की)
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्कृत व महाभारताच्या अभ्यासक लीना मेहेंदळे यांची 'महाभारताची समग्र ओळख' ही व्याख्यानमाला वर्षभरापासून सुरू आहे. या व्याख्यानमालेत पन्नासपेक्षा अधिक विचारपुष्प गुंफून मेहेंदळे यांनी सामान्यांपासून जाणकारांपर्यंत सर्वांमध्ये महाभारताकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित केली आहे. माणसाच्या रोजच्या आयुष्यातील महाभारताचे स्थान या व्याख्यानांमधून अधोरेखित होते. निवृत्त प्रशासकीय अधिकारी असलेल्या लीना मेहेंदळे यांच्याशी या अभिनव प्रकल्पानिमित्त चिंतामणी पत्की यांनी साधलेला संवाद.
-----------------------
- महाभारताची नव्याने ओळख करून द्यावीशी का वाटली?
- आमच्या लहानपणी विविध ग्रंथाची पारायणे केली जात. प्रत्येकाजवळ गोष्टींचा संग्रह असे. आजच्या पिढीला यातील काही माहीत नाही. आता एक श्लोक म्हणता येत नाही कुणाला. पालकही त्याची ओळख करून देत नाहीत की कसली माहिती देत नाहीत. भांडारकर संस्थेची सुरुवात महाभारताच्या संशोधनासाठीच झाली. या संस्थेने १९१७ ते १९५५ या वर्षांत संशोधन करून महाभारताची चिकित्सक संपादित आवृत्ती प्रकाशित केली. या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त लोकांना कथेच्या स्वरूपात महाभारत सांगावेसे वाटले. संस्थेनेही कल्पना मान्य केली आणि व्याख्यानमाला सुरू झाली.
- ही व्याख्याने उपलब्ध साहित्यावर आधारित आहेत की संशोधनावर?
- संस्थेत उपलब्ध असलेले विविध साहित्य आणि परंपरेने जे ज्ञान मिळाले आहे, त्यावर आधारित ही व्याख्यानमाला आहे. पुरातत्त्व शास्त्रातील संशोधनाची बाजू यामध्ये येत नाही. लोकांना कथा आवडतात म्हणून कथास्वरूपात व्याख्याने होतात. गेल्या वर्षी गुढीपाडव्याला व्याख्यानांना सुरुवात झाली. आणखी तीन महिने तरी व्याख्याने होतील. संस्थेच्या सभागृहात दर बुधवारी व्याख्यान असते. आतापर्यंत पन्नासपेक्षा अधिक व्याख्याने झाली आहेत. युद्धातील महत्त्वाचे कथानक संपले आहे. शांती पर्व, स्त्री पर्व असे शेवटचे पर्व सुरू आहे. महाभारतातच एक अनुक्रमणिका आहे. त्या क्रमानुसार व्याख्याने होत असल्याने श्रोत्यांची रुची, कुतूहल आणखी वाढत जाताना दिसते. महाभारताविषयी अनेकांनी ऐकलेले असते; पण समग्र महाभारत कथास्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयोग सहसा होत नाही.
- तुम्ही प्रशासनात मोठ्या पदांवर दीर्घ काळ काम केले आहे. प्रशासन आणि व्यासंग हा सुरेख मेळ कसा साधता आला?
- माझे वडील डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री संस्कृत आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांच्याकडे खूप विद्यार्थी येत. वडिलांच्या ग्रंथालयात भारतीय प्राचीन वाङ्मय, महाभारत, रामायण, उपनिषदे, गीता असे मौलिक साहित्य होते. आम्ही ते वाचत गेलो. वडिलांनी गीता पाठ करून घेतली. या ज्ञानाचा नकळत संस्कार होत गेला आणि रुची निर्माण झाली. गोव्याची मुख्य माहिती आयुक्त म्हणून मी निवृत्त झाले. प्रशासन, व्यवस्थापन या क्षेत्रांत काम करताना ज्ञानाचा उपयोग झाला. प्राचीन शास्त्रांमधील व्यवस्थापन आपल्याला खूप काही शिकवून जाते. चांगल्या अर्थाने काम करताना आपली भूमिका भक्कम लागते. त्यासाठी पूर्व वाचन आणि व्यासंग महत्त्वाचा ठरतो.
- तुम्ही भारतीय व पाश्चात्य प्राचीन शास्त्र, ज्ञान, परंपरा याकडे कसे पाहता?
- ललित साहित्यापेक्षा शास्त्रीय, विज्ञान, विवेचनात्मक आणि वैचारिक साहित्याकडे माझा ओढा आहे. महाभारतातील समाजशास्त्र, राजकारण, व्यवस्थापन, युद्धशास्त्र अशा विविध शास्त्रांचा विचार आपण करत नाही. भारतीय ज्ञान परंपरेतील तर्कशास्त्राचा आचरणात अनुभव घेतला नसेल; तर त्याला दर्शन किंवा तत्त्वज्ञान म्हटले जात नाही. आचरणाशिवाय अनुभूती येऊ शकत नाही. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा, तर्कशास्त्राचा आणि आचरणाचा संबंध नाही. त्यात विसंगती दिसते. कार्ल मार्क्स किंवा लेनिन कामगार नव्हते. कामगाराचे आय़ुष्य जगून त्यांनी तत्त्वज्ञान मांडले नाही. कोणत्याही पाश्चात्य तत्त्ववेत्याचे उदाहरण घेतले तर हेच जाणवते. या उलट चंद्रगुप्त मौर्य या मोठ्या सम्राटाने सिकंदराशी संघर्ष केला आणि तो एकाएकी जैन धर्म स्वीकारून कर्नाटकात गेला, अशा नायकांचे चरित्र लोकांना सांगितले पाहिजे.
- परंपरेने आलेले तर्कशास्त्र आजच्या भारतीय समाजात दिसते का? अगदी रस्त्यावर कसे वागावे, वाहतुकीचे नियम यामध्ये तर्क दिसून येतो का?
- आपल्या तत्त्वज्ञानात तर्कशुद्धता व अनुभवसिद्धता अपेक्षित आहे. ती नसेल तर पुढे अंध:कार आहे, असे समजावे. नियम पाळणारे, सभ्यता पाळणारे लोक आहेत म्हणून तर समाज टिकून आहे ना? अशा लोकांचे प्रमाण वाढविणे हे आपल्या हाती आहे. त्यांसाठी असे कथानक, चरित्र सांगणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट