2/01 शिक्षणाची फेररचना हवीच, पण तिचे केंद्र हवे खेडे

शिक्षणाची फेररचना हवीच, पण तिचे केंद्र हवे खेडे
कोल्हापूर सकाळ (४१)
२७.३.८५
(इथे विचारांना वाव आहे या माझ्या लेखांच्या संकलनांत)
आपला भारत हा एक अतिशय विस्तृत असा देश आहे आणि त्यांत सर्व प्रकारची भौगेलिक स्थित्यतरे, व भाषात्मक स्थित्यंतरे बघालया मिळतात. एवढे सगळे असूनही हा एक अतिशय एकसंघ असा देश आहे. या देशाची संस्कृती हजारो वर्षापासून चालत आलेली व म्हणूनच सर्वत-हेच्या समाजाना, सर्व त-हेच्या विभागांना एकत्र बाधून ठेवणारी अशी आहे. अशा या संस्कृतीत शिक्षणाला काय महत्व दिले जाते, याचा ऐतिहासिक आढावा घ्यायचाच असेल तर आपल्याला येट भगवद्गीतेपर्यंत जाता येते आणि 'न हि ज्ञानेन सदृशम्‌ पवित्रमिह विद्यते' असा साक्षात्‌ भगवंताचाच पुरावा देता येतो. म्हणून शिक्षणाचा प्रसार, प्रचार हा या राष्ट्राच्या समृद्धीचा एक मापदंड मानला पाहिजे.
नुकतेच पंतप्रधानांनी सध्या अस्तित्वात असलेली शिक्षण पद्धती बदलण्याची व त्यामधे काही चांगले बदल करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले आहे.
या संदर्भात आपल्याला काय प्रकारचे बदल हवेत व ने कसे उपकारक ठरतील हे तपासून बघणे योग्यच होईल.
सध्याचा शिक्षण पद्धतीतले जे दोष आहेत ते वेळोवेळी व वेगवेगळया व्यक्तींनी अतिशय चांगल्वा रीतीने व्यक्त केलेले आहेत. त्यामुळे हे दोष विस्तृतपणे सांगण्याची गरज नाही. परंतु ते दूर करत असताना काय करायला पाहिजे याची एक ठोस दिशा शोधून काढणे ही आजची गरज आहे. शिक्षण पद्धतीतील काही ठळक दोष माझ्या मते असे आहेत.
1. सध्याची शिक्षण पद्धती ही एक ठराविक वारसा घेऊन आलेली आहे. ब्रिटिशांच्या काळात इथल्या रयतेचे व ब्रिटिश शासन चालवणा-या शासकांचे एकमेकांशी संभाषण (Communication) होण्यासाठी सर्वप्रथम इथल्या लोकांमधूनच काही दुभाषे निवडण्याची गरज ब्रिटिश शासनकर्त्याना भासली व त्यामधून इंग्रजीचे शिक्षण हा शिक्षणाचा एक अविभाज्य घटक बनून राहिला. त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीने या देशात आपले पाय स्थिर केल्यानंतर येथील दैनंदिन शासनकारभार त्यांनी आपल्या हातात घेतला. त्या वेळेला या कारभारासाठी लागणारा मोठा नोकरशाहीचा (Bureaucracy) वर्ग त्याना इथेच निर्माण करण गरजेचे होते. तो निवडण्याकरिता काही तरी प्रमाण (Standardisation) हवे या उद्देशातून एक ठराविक शिक्षणपद्धती आणि एक ठराविक परीक्षा पद्धती या दोन्हींची निर्मिती झाली. कारकुनाच्या नोकरीला पोषक असेच हे शिक्षण होते.
एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे. ती अशी की ब्रिटिश शासन काळात सार्वत्रिक शिक्षणाची(Universalization of education) जी कल्पना रूढ झाली व स्वातंत्र्योत्तर काळात तिचा जो पाठपुरावा केला गेला त्यामुळे आपल्या देशाला पुष्कळ फायदा मिळाला आहे. म्हणूनच शिक्षण पद्धतीच्या पुनर्गठनाचा विचार करताना सर्वांना शिक्षण (Universalization of education) हा सध्याच्या पद्धतीतला गुण कुठल्याही प्रकारे टिकवून धरणे गरजेचे आहे. याला दुसरेही कारण आहे. आपल्या लोकशाहीने सर्वांना समान संधीचा जो अधिकार दिलेला आहे तो शिक्षण असलेल्या व शिक्षण नसलेल्या अशा दोन व्यक्ती किंवा दोन गटांसाठी राबवायचा ठरला तर केव्हाही झुकते माप हे शिक्षण असलेल्या व्यक्तीच्याच पदरात पडणार आणि समान संधी ही घटनेने दिलेली शाश्र्वती इथेच मोडीत निधणार. म्हणूनच प्रत्येकाला समान संधी मिळण्यासाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही शासनावर येऊन पडते.
ही जबाबदारी शासनाने उचललेली देखील आहे आणि म्हणूनच आपल्या देशात फार मोठया प्रमाणावर प्राथमिक शिक्षणाचा विस्तार आणि प्रचार झालेला आहे. परंतु यातून निर्माण होणारे जे दोष आहेत ते फार मोटया प्रमाणावर आता आपला प्रभाव दाखबू लागले आहेत. म्हणूनच त्यांचा ठळक पणे उल्लेख होणे गरजेचे आहे.
1. आजचे शिक्षण हे विद्यार्थ मध्ये किंवा समाजामध्ये नैतिक मूल्य बाणवण्यात व जोपासण्यात असमर्थ ठरलेले आहे.
२. शिक्षणामुळे ज्ञानाची प्राप्ती याचबरोबर कलागुणांची प्राप्ती, कल्पकता व तर्कयुक्त बुद्धी आणि चिंतनशील मन यांची प्राप्ती झाली पाहिजे. आजच्या शिक्षणातून फक्त ज्ञानाची किंवा मी म्हणेन फक्त माहितीची (Information) प्राप्ती होत आहे. परंतु तर्कसंगत बुद्धीची वाढ, वैज्ञानिक दृष्टिकोनाची (Scientific atitude) वाढ आणि त्याच बरोबर कला-गुणग्राहकता वाढीला लागत नाही, हा शिक्षणाचा दुसरा मोठा दोष आहे. या गोष्टी जर शिक्षणामुळे प्राप्त होत नसून नुसती माहितीवजा शिक्षण देणारी पद्धती असेल तर त्यातून तयार होणारे विद्यार्थी आणि कमी क्षमतेचा एक कम्प्यूटर यात काहीही फरक राहणार नाही. यामुळे मनुष्यप्राणी म्हणून मनाची व बुद्धीची जी काही उन्नती हवी ती होऊ शकणार नाही.
३. या शिक्षणामधे हस्तकौशेल्यावर अजिबात भर न दिला जाता फक्त पुस्तकी ज्ञानावर भर दिलेला आहे. त्यामुळे हे शिक्षण प्राप्त करून घेतल्यानंतर कष्टाची किंवा स्वतःच्या दोन हातांचे सामर्थ्य आणि कुशलता वापरून कमावण्याची इच्छाशक्ती नष्ट होत चालल्याचे आढळून येते. सर्वत्र बैठी नोकरी किवा बैठे काम मिळण्यासाठीन प्रयत्न होत असतात. यामुळे श्रमाची तसेच मानवी जीवनाची देखील फार मोठी अप्रतिष्ठा होत आहे.
४. या शिक्षण पद्धतीमुळे जिथे बैठी, कारकुनी नोकरी उपलब्ध आहे अशा ठिकाणी इच्छुकांचे लोंढे जातात. म्हणजेच शहराकडे सुशिक्षित तरूणांचे ब्रेन ड्रेन होत राहते. त्यामुळे खेडयांतून सुशिक्षित माणसांचे प्रमाण घटत जाते आणि शहरांतून हे प्रमाण जरी याढत गेले तरी या सर्वांना नोकरीत सामावून घेण्याची शक्यता नसल्यामुळे शहराच्या दृष्टीने देखील या सुशिक्षित मुलांच्या शिक्षणाचा काहीही फायदा होत नाही.
५. या शिक्षण पद्धतीतील फार मोठा दोष म्हणजे वेळेचा अपव्यय. शिक्षणाचा एकूण वर्षाचा कालावधी बघितला तर आपल्या सहज असे लक्षात येते, की इतका कालावधी खर्च करून शिक्षण घेणे हे फक्त श्रीमंत किंवा फार तर उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांनाच शक्य आहे. जे समाजातील दुर्बल घटक आहेत - मग ते आर्थिकदृष्टया दुर्बल असोत, जातीपातीच्या भेदभावामुळे सामाजिकरीत्या दुर्बल असोत किंवा भौगोलिकदृष्टया मागासलेल्या भागातील असोत, अशा सर्व मुलांच्या दृष्टीने हा एवढा वेळ शिक्षणावर खर्च करणे हा अपव्यय कसा ठरतो हे थोडेसे सांगितले पाहिजे.
या मुलांना नोकरी करायची म्हटली तर चांगले शिक्षण म्हणजे किमान एस.एस.सी. पर्यतचे शिक्षण मिळाल्या शिवाय नोकरीची शक्यता नसते. आणि एस.एस.सी पर्यतच्या म्हणजे किमान दहा वर्ष घालवून मिळालेल्या शिक्षणानंतर नोकरीची शाश्र्वती नसते. म्हणजे न घेऊन खोळंबा आणि घेऊन अडचण. अशा प्रकारचे शिक्षण त्यांच्या दृष्टिकोनातून निरर्थक ठरते. मध्यमवर्गामधील मुलांबाबत सुद्धा सर्वसाधारण परिस्थिती अशीच आहे. फक्त जी मुले अत्यन्त उच्च शिक्षण घेऊ शकतात त्यांना त्या शिक्षणातून पुढे चांगला फायदा होऊ शकतो. आणि आज शिक्षण कोण घेऊ शकतो? माझ्या अजोबांच्या काळांत सातवीपर्यंत शिक्षण घेऊन जीवनांत आर्थिकदृष्टया स्थिर होण्यासाठी त्याचा फायदा करून घेता येत असे. नंतर मॅट्रिकपर्यत शिक्षण असणे गरणेचे होऊन बसले. आता ही गरज बी.ए. व एम.ए. पर्यत वाढलेली आहे. अशा त-हेने शाळेत व शालेय शिक्षणात वेळ व पैसा घालवत असताना तयार झालेली मुले जरी खेडेगावांत असली तरी स्वतःच्या लहान बहीण भावंडांचा अभ्यास करून घेण्यासही असमर्थ असतात, असे वेळीवेळी दिसून आलेले आहे. पर्यायाने या मुलांच्या शिक्षणाचा फायदा ना त्यांच्या शेतावर ना त्यांच्या घरात आणि ना त्यांच्या समाजात. असे हे शिक्षण एक प्रकारे कालापव्यय आहे व पैशाचा देखील अपव्यय आहे, असे वाटू लागते.
दुस-या बाजूने विचार करता शिक्षण अजिबातच घेतले नाही तर हा मागासलेला वर्ग कधीही पुढे येऊ शकत नाही. त्यांचे पुढे येण्याचे सर्व मार्ग खुंटतात हेही स्पष्ट चित्र दिसून येते. त्यामुळे हे शिक्षण टाकून देता येईल आहे, अशीही परिस्थिती नाही. यावर उपाय म्हणून शिक्षण अशा प्रकारे असले पाहिजे की, ते घेतल्यामुळे माणसाचे बौद्धिक व मानसिक जीवन समृद्ध व्हावे, त्याचबरोबर त्याचे आर्थिक जीवन समृद्ध व्हावे आणि समाज पुरूषाचे देखील सामाजिक जीवन समृद्ध व्हावे. अशा प्रकारचे शिक्षण आपल्याला हवे असले तर शिक्षण क्षेत्रात फार मोठया प्रमाणावर व्यवसाय शिक्षण आणण्याची गरज आहे.
व्यवसाय शिक्षण सुरू करण्याचे बरेच प्रयत्न आतापर्यत करण्यात आले. अमदी बेसिक शिक्षणापासून प्रयोग झाले. त्यानंतर १०-१-२ असा दोन वर्षाचा टप्पा व्यवसाय शिक्षणासाठी ठेवून एक नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला. तो टाकून डिप्लोमा कोसेर्स तयार करण्यात आले. पण सगळया योजनांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही. किंबहुना या योजनांच्या बांघणीतच काहीतरी चूक होती असे वारंवार वाटू लागते.
व्यवसाय शिक्षणासाठी असा अभ्यासक्रम हवा जो खेडोपाडयातल्या मुलांना उपयुक्त असेल. सध्या आपल्या ब-याच व्यवसाय शिक्षणक्रमांतून लघुलेखन, टंकलेखन, शिवणकाम असे शहरी भागातच कारकून पुरवठा करणारे उद्योग हे व्यवसाय म्हणून राबवले जातात, त्या मधे आता कम्प्यूटर मॅनेजमेंट सारख्या कोर्सेसची भर पडली आहे. परंतु हे करत असताना आपण वारंवार हे विसरतो, की अशा शिक्षणाने आपण फक्त शहरीकरणालाच प्राधान्य देत असतो. असे न होता ग्रामीण भागातला शेतकरी आहे तिथेच राहावा, त्याच्या शेतातच राहावा. परंतु ज्ञानाने समृद्ध व्हावा असे धोरण आखले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आज खेडयांतील शेती ही त्या त्या कुटुंबाच्या संपूर्ण आर्थिक गरजा भागवू शकत नाही. हा विचार करून शेतावरच राहून एखादा शेतकरी नवीन त-हेच्या व्यवसाय शिक्षणातून आपले उत्पन्न कसे वाढवू शकेल, याचा विचार करायला हवा.
खेडोपाडी राहिलेल्या बलुतेदारांना त्यांच्या व्यवसायातील आधुनिक पद्धतीचा फायदा कसा मिळू शकेल, त्या कशा शिकता येतील, याचा विचार करायला हवा. हे बलुतेदार कशा प्रकारे स्वतःला शिक्षित करून घेऊ शकतील व कच्च्या मालाच्या पुरवठयासाठी खेडेगांवांत कशा संघटना उभारू शकतील त्याचबरोबर खेडोपाडी तयार होणा-या सामग्रीला बाजारपेठ कशी मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून शिक्षणाचा विकास व विचार होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाला अत्यावश्यक असे कित्येक उद्योगधंदे व त्या उद्योगधंद्याचा एक शिक्षणक्रम नव्याने तयार करून त्याचे शिक्षण हे शालेय शिक्षणाबरोवरच देता येईल.
शालेय व व्यावसायिक या दोघां शिक्षणक्रमांचे अशाप्रकारे एकत्रीकरण (क्ष्दद्यड्ढढ़द्धठ्ठद्यत्दृद) करता येईल, की जेणेकरून एखादा मुलगा अत्यंत गरीब असेल तर तो दोन-तीन वर्षातच एखादे अर्ध कोशल्य (च्ड्ढथ््रत् द्मत्त्त्थ्थ्) मिळवून बाहेर पडावा. पुढे-मागे आपण मिळवलेल्या अर्धकौशल्याची पुन्हा उजळणी करून घेण्याची, ते वाढवण्याची व त्यामधून अधिक चांगले कौशल्य प्राप्त करून घेण्याची संधी त्याला मिळेल, अशी सोय असावी.
त्याच्या शिक्षणक्रमांत विज्ञान, गणित या सारखे तर्कबुद्धीची वाढ करणारे विषय असावेत तसेच भाषेच्या शिक्षणाचाही त्या मधे समावेश असावा. त्यामुळे त्याची विचारशक्ती प्रगल्भित होऊ शकेल. जोडीला क्रीडा, चित्रकला, गायन, नृत्य अशासारख्या कलांचे शिक्षण मिळू शकेल अशा प्रकारे शिक्षणामध्ये बदल होण्याची गरज आहे. खेडयांकडून शहराकडे होत असणारे ब्रेनड्रेन थांबवले जाईल आणि खेडयात राहूनच स्वतःचा आर्थिक व बौद्धिक विकास करून घेता येईल अशा प्रकारचे शिक्षण निर्माण कराण्याची गरज आहे. याच्या बरोबरीला काळाची गरज म्हणून खेडेगावांत मनोरंजनाची साधने मोठया प्रमाणात मिळण्याची गरज आहे. सुदैवाने टी.व्ही. चे जाळे देशात जोराने वाढत असल्यामुळे खेडोपाडी करमणुकीची व्यवस्थाही सहजशक्य होणार आहे. परंतु जोपर्यंत खेडोपाडी व्यवसाय शिक्षण व्यवस्था, श्रमाला प्रतिष्ठा देणारी शिक्षणाची व्यवस्था होऊ शकत नाही, जोपर्यंत स्वतःच्या कष्टातून निर्मिती करण्याची शक्ती व कौशल्य बाहूत निर्माण होत नाही तोपर्यंत समाजदेखील कधीही आर्थिक दृष्टया समृद्ध व सुसंस्कृत होऊ शकत नाही.
अशा प्रकारे मूलतः कुटिरोद्यांगाना पोषक व त्या जोडीने विज्ञान आणि कलेचा परिचय करूण देणारे शिक्षण आज खेडोपाडीच नव्हे, तर सर्वांसाठी हवे आहे. असे असेल तर बेसिक शिक्षणाची कल्पना का यशस्वी झाली नाही, हेही समजून घेतने पाहिजे. बेसिक शिक्षण म्हणजे निर्यंत्रीकरण, अशी आपण समजूत करून घेतली. कुठल्याही शाळेत सूतकताई किंवा शाळेच्या शेतावरील खुरपणी, पेरणी यापलीकडे बेसिक शिक्षणाचा अभ्यासक्रम गेला नाही. शहरातील कोणते मोठया भांडवलावर चालणारे उद्योग आपण कमीत कभी भांडवलात, परंतु विस्तृत प्रमाणावर खेडोपाडी आणू शकतो, यासाठी कशा प्रकारचे व्यवसाय शिक्षण हवे, हे आपण तपासून पाहिलेच नाही. इतर देशांच्याच मदतीने मोठया प्रमाणात आपले औद्योगिक उत्पादन वाढवायवे असेल तर निर्यंत्रीकरणाच्या कल्पनेतून आपण टिकू शकत नाही. परंतु छोटया भांडवलदारीचे असंख्य उद्योग खेडेगावाता आणले जाऊ शकतात. याचा आपण विचार केला नाही व त्यांना पोषक असे व्यवसाय शिक्षणदेखील निर्माण केले नाही, हा दोष सुधारणे आता गरजेचे आहे. थोडक्यात, आजचा शिक्षणक्रम हा खेडेगावांना अधिक समृद्ध करू शकणार्‍या योजनांशी निगडित हवा.
या सर्ववरोबरच महत्वाचा मुद्दा आहे आपल्या देशाच्या आर्थिक क्षमतेचा. देशातील १९४७ सालच्या लोकसंख्येत आज दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते. ३५ कोटीवरून लोकसंख्या आज ६५ कोटींच्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. ज्यांना शिक्षण देण्यास शासन बांधील आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या जवळ -जवळ त्याच प्रमाणात वाढलेली आहे. लोकसंख्या वाढीचे साधारण हेच प्रमाण येथून पुढेही राहील आणि शाळकरी मुलामुलीच्या संख्येत साधारणपणे याच दराने वाढ होईल. या सर्वांच्या शिक्षणाचा आर्थिक बोजा आपल्याला झेपेल काय, हा प्रश्न आहे. एका शाळकरी मुलाच्या प्राथमिक शिक्षणामागे शासनाला जवळ-जवळ चार रूपये इतका खर्च येतो. तेच माध्यमिक शिक्षण असेल तर त्यासाठी शासनाला जवळ-जवळ १५ रूपये खर्च येतो आणि उच्च शिक्षण असेल तर हा खर्च १०० रूपयांपासून ५००० रूपयांपर्यत कोठेही जाऊ शकतो. अशा परिस्थिति शाळकरी मुलांच्या संख्येत जी वाढ होणार आहे तेवढया मोठया प्रमाणावर शिक्षण देणे आर्थिक दृष्टया किती परवडण्यासारखे आहे याचाही विचार करून शिक्षणावर होणारा हा शासनाचा खर्च कोठल्या प्रकाराने कमी करता येईल त्या प्रकारच्या योजना आखण्याची गरज आहे.

हे करीत असताना मुलांना चांगल्या प्रयोगशाळा मिळाल्या पाहिजेत आणि शाळेची इमारत देखील चांगली मिळाली पाहिजे हा विचार आपण बाजूला ठेवू शकत नाही. परंतु या देशातील युवकांची शक्ती व विशेषतः विद्यार्थीवर्गाची शक्ती या कामी लावली तर शिक्षणावर होणार्‍या खर्चात मोठी कपात करणे शक्य आहे. शिक्षण घेणार्‍या प्रत्येक मुलाने विशेषतः ज्यांना परीक्षेत फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, ऑनर्स, यासारखी विभूषणे मिळवायची असतील त्यांच्या बाबत तरी असा नियम करयास हरकत नाही, की त्यांच्या शिक्षणक्रमात शिकवणे, विद्यादान हा देखील एक आवश्यक घटक असेल. यामुळे आपल्याला चांगली हुषार मुले शिक्षक म्हणून वापरायास मिळू शकतील आणि या हुषार मुलांकरवी लहान वर्गातील मुलांचे शिक्षण चांगल्या रीतीने घडू शकेल. नाहीतरी उच्च शिक्षणासाठी होणारा एका विद्यार्थ्याचा सर्व खर्च काही पालक करीत नाहीत, त्यात शासनाने म्हणजेच समाजानेही मोठा हातभार लावलेला असतो. हे ऋण फक्त आपले ज्ञान इतरांना देऊन व अशा प्रकारे समाजाचा खर्च वाचवूनच फेडले जाऊ शकते. या पर्यायासोवत शिक्षणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी दुसरा एक उपाय आहे. व्यवसाय शिक्षण आणि औपचारिक किंवा पुस्तकी शिक्षण याची सांगड घालत असताना आज जे एम.ए. पर्यतचे शिक्षण सतरा वर्षाच्या कालावधीत दिले जाते किंवा डॉक्टरेटची पदवी मिळवण्यासाठी जी किमान वीस वर्षे शिक्षणात घालवावी लागतात हा शिक्षणक्रमाचा कालावधी मोठया प्रमाणावर कमी (Condense) करता येणे शक्य आहे. त्यासाठी मी शिक्षणक्रमाचे वेगळे वेळापत्रक सुचवू इच्छिते.
सध्या पहिली ते चौथी या चार वर्षात जे काही शिकवते जाते त्यामध्ये व्यवसाय शिक्षणाची मूलभूत कल्पना देणारे, परंतु विद्यार्थ्याच्या वयाला झेपेल अशा प्रकारचा शिक्षणक्रम समाविष्ट करून हा संबंध चार वर्षांचा शिक्षणक्रम दोन वर्षात पूर्ण करणे शक्य आहे. मात्र यासाठी कदाचित शालेय प्रवेशाचे वय थोडे वाढवावे लागेल. पाचवी ते सातवी या तीन इयतांतील शिक्षणक्रम दोन वर्षात देता येईल. त्याचबरोबर व्यवसायिकतेवर जास्त भर देणारा एक पूरक अभ्यासक्रम त्यामध्ये integrate करता येणे शक्य आहे. त्यापुढील सध्याचा आठवी ते दहावी हा शिक्षणक्रम छोटा करता येईल. किंवा त्यामधे पुस्तकी शिक्षणाच्या जोडीला व्यावसायिक शिक्षणक्रम मोठया प्रमाणात Integrate केला जाऊ शकतो. अशा प्रकारे दहा वर्षांचा शिक्षणाचा कालावधी हा सात वर्षांपर्यत आणला जाऊ शकतो. पुढील पाच वर्षांत व्यवसाय शिक्षणावर मोठया प्रमाणात भर देऊन शिवाय हा शिक्षणक्रम तीन वर्षात बसवता येऊ शकतो, तर पदव्युत्तर शिक्षणासाठी जो चार ते पाच वर्षांचा काळ वापरला जातो तो देखील दोन वर्षापर्यंत कमी केला जाऊ शकतो.
मात्र या सर्व शिक्षणक्रमात शिक्षणातून खेडेगावाचा आर्थिक विकास हे सूत्र असले पाहिजे आणि त्यासाठी या सुधारणेबरोबरच खेडयामध्ये विकासाचे जाळे (Infrastructure) निर्माण व्हायला हवे.


खेडेगावातील आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी आवश्यक परंतु आतापर्यत दुर्लक्षिलेली अशीच एक बाब म्हणजे पाळणाघरे, शिशुमंदिरे किवा बालवाडया. त्यांची आज मोठी गरज कुणाला आहे? तर मजूरी किंवा नोकरी करणार्‍या अशिक्षित व सुशिक्षित सर्व लेकुरवाळ्या स्त्र्िायांना, कारण लहान मुले असली तरी त्यासाठी कामावर न जाणे हे त्यांना परवडणारे नसते. त्यांच्या कामावर न जाण्यामुळे कुटुंबावर येणारा आर्थिक ताण परवडणारा नसतो. याला खेडयात सर्रास वापरला जाणारा उपाय म्हणजे घरातील सर्वांत मोठया मुलाला किंवा मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवायचे आणि घरातील इतर सर्व बालकांचा सांभाळ त्याच्यावर सोपवायचा. या प्रकारात सुद्धा बहुतांशी मुलीवरच ही जबाबदारी येते. यामुळे शिक्षणाचे सार्वत्रीकरण होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे त्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणेही त्या छोटया पालकांना जमू शकत नसल्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच खेडयातीन स्त्र्िायांना निःशंक मनाने त्यांच्या कामावर जाता यावे यासाठी शासनाने एक वर्षापासून पाच वर्षाच्या मुलांकरिता मोठया प्रमाणावर पाळणाघराची सोय करणे गरजेचे आहे.
आजच्या आपल्या आर्थिक तरतुदीमध्ये प्राथमिक शिक्षणावरील तरतूद ही उच्च शिक्षणावरील तरतुदीपेक्षा किमान १०० पटीने तरी कमी आहे असे दिसून येते. हा खर्च तर वाढवला पाहिजेच. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन की अंगणवाडी, शिशुमंदिर, बालक मंदिर यांसारख्या उपक्रमांवर देखील भरीव तरतूद केली पाहिजे. उच्च शिक्षणासाठी शासन जो खर्च करते त्यामानाने हा अतिशय अल्प असेल. पण यामुळेच खेडयातील लहान मुलांच्या आरोग्यरक्षणाचा (क्ण्त्थ्ड्ड ण्ड्ढठ्ठथ्द्यण् ड़ठ्ठद्धड्ढ) कार्यक्रम आपोआपच १०० टक्के यशस्वी होऊ शकेल. लहान मुलांच्या आई-बापांना कामावर जाताना मुलांच्या सुरक्षिततेची काळजी राहणार नाही. आणि ज्या थोरल्या मुलीचे वा मुलाचे शिक्षण या एका कारणासाठी खोळंवून राहते तसेही होणार नाही. त्याच जोडीने लहान मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्याचे उपक्रम घेणे शक्य होईल. या सर्वामुळे लहान मुलांची शिक्षणाची मूलभूत पातळी (Basic Level of Knowledge) चांगल्या प्रकारे वाढू शकेल.
अशा प्रकारे जेंव्हा शिक्षणामुळे सर्वप्रथम आर्थिक प्रश्न सुटण्याची हमी निर्माण होईल तेव्हा आपोआपच समाजातील नैतिक पातळी व पर्यायाने समाजाचे नैतिक बळ वाढीला लागेल. अशा प्रकारचा शिक्षणक्रम असेल तर विकासासाठी हाती घेतलेल्या अन्य योजनांनाही तो पूरक ठरेल. यामुळे सुशिक्षित बेरोजगार, शहरामधील झोपडपट्टीची वाढ, ग्रामीण भागातीत दिशाहीन जीवन व समाजातील नैतिक मूल्यांचा -हास यासारखे प्रश्न सुटू शकतील.
-------------------------------------------------------------
ALl articles of Ithe Vicharana Vav Aahe are kept on son_denare_pakshi

Comments

shilpa verma said…
dear madam,i could not rest unless i had read this article,after our long chat today evening i could feel every word u have written.i will find time to read all ur articles.regars shilpa verma.
Thanks shilpa, I noticed your comments only today. We have a lot to talk and ACT. I am coming to A'bad on 17th Nov for the biodiversity seminar in Univ. May be we meet then.

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट