आपली शिक्षण व्यवस्था -- अपूर्ण


आपली शिक्षण व्यवस्था
स्वतंत्र भारताची वाटचाल पंच्याहात्तर वर्षाची होत असतांना
देशातील समाज व्यवस्था बिघडली आहे हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज उरलेली नाही. या बिघाडांचे पाढेही खूपदा वाचले गेले आहेत. बिघडत चाललेले राजकारण, भ्रष्टाचार, वाढत चाललेली भीषण आर्थिक विषमता, जात - प्रांत – धर्म - भाषा यातून वाढत चाललेली दुफळी आणि समाजमनाचे विभाजन, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे देशातील आर्थिक आणि राजकीय व्यवहारांभोवती आवळत चाललेले पाश, शिक्षणाक्षेत्रात व्यापून उरलेले अभाव आणि त्यातून निर्माण होणारी निरक्षरता, प्रचंड बोकाललेला चंगळवाद, कुप्रशासन, ब्रेनड्रेन इत्यादी काही ठळक उदाहरण सांगता येतील. मला वाटत नसले तरी कित्येकांना वाढलेली जनसंख्या हे ही कारण वाटते.
ब्रेनड्रेन नव्हे, ब्रेनबँक असे कधीकधी म्हटले जाते. परंतू सर्व मोठ्या शहरात वृद्धाश्रम वाढत आहेत, मुले परदेशांत व इकडे परत येऊ इच्छित नाहीत म्हणून घरात फक्त वृद्ध आईबापच हे चित्र पसरत चालले आहे. कित्येक परदेशी मुलांना विचारल्यावर ते सांगतात की परदेशांतील मोठ्या पगाराकडे आम्ही दुर्लक्ष करू, पण या देशांत जी अस्वच्छता आणि प्रदूषण पसरलेले आहे – वातावरणात, राजकारणात, आणि समाजजीवनातही – त्याचा सामना आम्ही इथे आल्यावर करू शकणार नाही या भितीपोटी आम्ही परत येण्याचा विचारच करत नाही.
या सर्वात काही बदल घडवायचा असेल, आपली परदेशस्थ मुले आपल्याजवळ परत आणायची आसतील, पुढील पिढ्यांचे जीवन समृद्ध करायचे असेल, तर ते आपणच करायचे आहे आणि ते केवळ शिक्षणाच्या माध्यमानेच होऊ शकते. पण त्यासाठी आताचे शिक्षण आणि शिक्षणतंत्र दोन्ही कुचकामी आहेत. त्यामधे बदल होणे नितांत गरजेचे आहे.
शिक्षण म्हणजे काय आणि कशासाठी ?
शिक्षण ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि श्वास चालतो तोपर्यंत ती चालूच राहतो. पण आपण शिक्षण म्हणतो तेव्हा ते शाळा - कॉलेजातून मिळालेल्या, किंबहूना कुणीतरी जाणीवपूर्वक दिलेल्या शिक्षणाचा विचार करीत असतो.. ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता यावे म्हणून समाजाने आणि प्रशासनाने केलेली व्यवस्था म्हणजेच शिक्षण- व्यवस्था.
कशासाठी शिक्षण या प्रश्नाचा विचार दोन बाजूंनी करावा लागेल. प्रत्यक्ष जी व्यक्ति शिक्षण घेत असते. तिला यातून काय मिळणार आहे आणि ज्या समाजाने ही शिक्षण-व्यवस्था निर्माण केली, ज्या समाजामधे त्या व्यक्तिला पुढेही रहायचं आहे, त्या समाजाला काय मिळणार आहे.

व्यक्तिगत उद्दिष्ट -
शिक्षण घेण्याने शिक्षण घेणाऱ्याला काय मिळाले पाहिजे ? सर्वप्रथम शिकणे म्हणजे काय? कसे शिकायचे, कुणीहीकडून पटकन ज्ञान कसे घ्यायचे हे कळायला हवे.. शिक्षण – व्यवस्थेबाहेरच्या जगातील ज्ञान कसे हस्तगत करायचे ही दृष्टि आली पाहिजे. चौकस बुद्धि निर्माण झाली पाहिजे. शिकण्याची आस लागली पाहिजे, त्याची गोडी व आवड, लागली पाहिजे. शिकण्याविषयी, निरनिराळ्या विषयांबाबत मनात औत्सुक्य, आसुसलेपणा आणि शिकून घेण्याची हातोटी निर्माण झाली पाहिजे. थोडक्यातं शिकण हा छंद झाला पाहिजे.
शिक्षणातून शिकण्याचा छंद जडला पाहिजे
दुसरे उद्दिष्ट -- देह टिकवण्यासाठी पोटाला भाजी भाकरी मिळालीच पाहिजे. ती कमवण्याची पात्रता शिक्षणातून मिळायला हवी . ती नेमकी पात्रता येत नसल्याने आजचे शिक्षण कुचकामी वाटते. तशीच ही पात्रता वर्षानुवर्ष शिक्षणात न घालवता लौकरात लौकर निर्माण झाली पाहिजे. इतर कशालाही वेळ लागला तरी पोटार्थी शिक्षण कमीत कमी वेळात मिळाला पाहिजे..
शिक्षणाने भाजी - भाकरी कमावण्याची पात्रता यायला पाहिजे.
जगाचा रामरगाडा चालतो आणि विकास पावतो. तो कौशल्यांच्या आधारवर. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त होतात ते अंगभूत कौशल्याच्या बळावर .म्हणून
शिक्षणातून कौशल्य व कार्यकुशलता निर्माण झाली पाहिजे.
शिक्षणाची सुरुवात म्हणजे सत्याची जाणीव.. खर काय आणि खोट काय हे जाणूनच आणि खऱ्याच्या बाजूने निर्णय घेऊनच पुढचे पाऊल टाकता येते, पुढचा जीवनक्रम चालवता येतो. सत्याची आच, सत्यनिष्ठा , निर्माण होण हे फक्त चांगल्या व य़ोग्य शिक्षणानेच घडू शकत. किंबहूना तसे घडवू शकत नसेल तर ते शिक्षण नाहीच. सत्याचा वेध घेण्यासाठी बुद्धि, मेधा, धृति व प्रज्ञा या चारी प्रवृत्तिंची जोपासना झाली पाहिजे..
शिक्षणातून सत्यनिष्ठा यायला पाहिजे.
माणसाच्या जीवनात उपभोग अनिवार्य आहे. संपूर्ण जीवन धारणा उपभोगावर तोलून राहिलेली आहे. श्वास घेणे, भाजी - भाकरी खाणे हाही उपभोगच आहेत. मात्र उपभोग्य वस्तूंची निर्मिती देखील मानवी श्रमातून होत असते हे ही तितकच खर. म्हणूनच
शिक्षणाने श्रमनिष्ठा शिकवली पाहिजे.
स्वतःच्या श्रमातून केलेल्या निर्मिती पुरताच उपभोगण्याचा हक्क आपला आहे. इतरांच्या श्रमातून झालेल्या निर्मिती उपभोगण्याचा हक्क आपली नाही., हे सत्य मनावर बिंबले पाहिजे. यासाठी संतोष व संयम पण यायला हवे. अचौर्य, दुसऱ्याचे काही लुबाडणार नाही ही जाणीव कायम राहिली पाहिजे. ईशावास्यात सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या श्रमाखेरीज इतर कुणाचेही धन घेणार नाही ही वृत्ति पाहिजे.
अचौर्यवृत्ति हवी.
श्रमातून निर्माण झालेली निर्मिती टिकवून कशी धरता येईल, वाया जाणार नाही, याची खबरदारी व जबाबदारी पेलता आली पाहिजे.
वस्तू व व्यवस्था टिकवण्याची क्षमता आली पाहिजे.
उपभोगासाठी आवश्यक ती कलासक्ती शिक्षणातून आली पाहिजे.
श्रमाइतकीच निर्मितीसाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे अन्वेषणा. श्रम आणि उपभोग हे कुठल्याही सजीव प्राण्याला आवश्यक असे उपजत गुण आहेत. मात्र अन्वेषणा, अविष्कार , शोध यासाठी लागणारी वेगळी बुद्धि माणसाला मिळाली आहे. त्या अन्वेषक वृत्तिची, वैज्ञानिक वृत्तिची, पुढे काय – ततः किम् हे विचारण्याची सव., आणि पात्रता हीच माणसाचे माणूसपण .
शिक्षणाने वैज्ञानिक, चौकस, प्रश्नवाचक, अन्वेषक प्रतिभेचा विकास झाला पाहिजे.
माणसाची सहज अंतः प्रेरणा म्हणजे करुणा, दुसऱ्याचे सुखदुःख वाटून घेण्याची वृत्ति. दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याची वृत्ति. हे माणूसपण शिकणही आवश्यक.
शिक्षणामुळे परदुखाःत समरसतेची वृत्ति आली पाहिजे.

माणूस समाजात रहातो, समाजाकडून लखमोलाच शिक्षण घेतो. त्या समाजाच ऋण मानले पाहिजे. आईवडील, शिक्षक, विविध संस्था, सामाजिक व्यवस्था यांच्या उपकाराची जाणीव ठेवली गेली पाहिजे.
शिक्षणामुळे कृतज्ञता आली पाहिजे. समाजगत उद्दिष्टे समजली पाहिजे.
समाजगत उद्दिष्ट -
ज्या समाजात आपण रहातो, त्याचे उपकार नुसते स्मरुन भागत नाही. ते दसपटीने परत फेडता आले पाहिजेत.
समाज टिकवण्यासाठी, एकसंध रहाण्यासाठी, त्याच्या विकास होण्यासाठी, नवीन येण्याऱ्या पिढ्यांचे जीवन जास्तीत जास्त संपुष्ट होण्यासाठी आपले हातभार लागले पाहिजेत. सामाजिक शांति टिकवली गेली पाहिजे. समाजाला योग्य ती दिशा आणि वळण मिळाल पाहिजे - देता आल पाहिजे. म्हणूनच शिक्षणाच्या समाजगत उद्दिष्टांची यादी मी येणेप्रमाणे करते -
शिक्षणमुळे सामाजिक ऋणांची जाणीव निर्माण होऊन त्यांची दसपट परतफेड करता आली पाहिजे.
शिक्षणामुळे त्याग, राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी बलिदान या भावनांची जाणीव आणि जागृति झाली पाहिजे.
सामाजिक शांति, समवेदना आणि समसरता टिकवण्याची हातोटी आली पाहिजे.
समाजाला प्रसंगी दिशा देण्यासाठी कधी नेतृत्वाची आघाडी तर कधी पिछाडीही सांभाळता आली पाहिजे.
समाजाला टिकवून धरण्याची कला, त्यासाठी आवश्यक ते नियम कानून घालून देणे, त्यांचा सांभाळ करणे, प्रसंगी ते बदलता येणे, प्रशासन चालवणे यासारख्या योग्यता यायला पाहिजेत.

हे सगळ कस होणार ?
एका शिक्षणातून हे सगळ कस होणार हा प्रश्न कुणालाही पडेल. आजच्या शिक्षण व्यवस्थेत तर यातले किती उद्देश साध्य होतात हे पहाण्यासाठी मायक्रोस्कोपच हाती घ्यावा लागेल. पण येणाऱ्या नवनवीन पिढ्यांना अस शिक्षण मिळायच असेल तर अशी शिक्षण व्यवस्था नव्याने निर्माण करावी लागेल. सध्याची शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल. ते करताना दोन गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. आताच्या शिक्षण व्यवस्थेतल्या काही गोष्टी समूळ उपटून टाकून तिथे काही तरी नवीन घडवून आणून बसवान लागेल. काही गोष्टी तशाच ठेऊन, किंवा थोड्या प्रयत्नाने सुधारून त्यांच्या चातुर्याने वापर करून घ्यावा लागेल. अशी नवीन व्यवस्था तयार करण्यासाठी आपल्या हाती काय साधन सामुग्री आहे आणि ती अपुरी असेल ( नव्हे असणारच ) तर पूरक साधन सामुग्री कुठून आणायची तसेच हाती असलेल्या साधन सामुग्रीचा वापर कसा करायचा याचाही विचार करावा लागेल. नवीन बदलांची योजना करताना हे बदल नेमके कशासाठी व कसे असतील हे ठरवून राबवताना वेळोवेळी तपासून बघावे लागेल.
हे बदल पाच- सहा प्रकाराने असतील.
शिक्षणाचा कालक्रम कमी करावा .
सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्याची किती वर्षे जातात ? दहा, बारा, पंधरा, सतरा, वीस, बावीस, पंचवीस... अशी चढती भाजणी आहे. दुसरीकडे निरक्षरतेचे प्रमाण भरमसाठ वाढत चालले आहे. सन २००० मधे साक्षरतेचे प्रमाण साठ टक्के होते. सव्वासे कोटींच्या देशांत पन्नास कोटी मनुष्यबळ निरक्षर आहे. त्यातही स्त्रिया, ग्रामीण स्त्रिया, शहरातील गलिच्छ वस्तीतील स्त्रिया, मागासवर्गीय जाती, आदिवासी, भटक्या जमाती, काही मागास राहिलेली बिहार सारखी राज्य, तर काही अरूणाचल प्रदेश सारखी दुर्गम राज्य, फार काय प्रत्यक्ष पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या शहराजवळील मावळ, मुळशी, वेल्हे, आंबेगाव यातील दुर्गम गावांमधे निरक्षरता फार मोठ्या प्रमाणावर आहे. दुमका या बिहार जिल्ह्यांत महिला साक्षरता फक्त दोन टक्के होती. यावरून आपल्याला " सर्वांना प्राथमिक शिक्षण" हा महत्वाचा टप्पा गाठायला देखील किती प्रयास पडणार आहेत याची कल्पना येते. एका व्यक्तीला साक्षर करण्यासाठी लागणारे श्रम, वेळ, उत्साह, कल्पकता आणि साहित्य या सगळ्यांची गोळा बेरीज करून त्याची किंमत जर हजार रूपये ठरवली तर फक्त निरक्षरता दूर करण्यासाठी येणारा खर्च चाळीस हजार कोटी रूपये असेल. त्यातून प्रत्येक नव्याने जन्माला येणाऱ्या बालकाला पुढे मागे साक्षर करावेच लागणार ही गरजही आहेच. सध्या देशांत दरवर्षी नव्याने सुमारे दहा लाख बालक जन्माला येतात. म्हणजे दरवर्षी फक्त साक्षरतेपोटी करावा लागणारा खर्च शंभर कोटींचा असणार आहे. असे हे सर्व आर्थिक गणित व्यस्त पडते.

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट