अँडव्हाण्टेज गोवा --- हा टिकणार का?

अँडव्हाण्टेज गोवा-- हा टिकणार का?
गेली वर्ष दीड वर्ष नोकरीनिमित्त गोव्याला वास्तव्य करण्याचा योग आला. त्यामुळे
इथले समाजजीवन जवळून पाहता आले आणि त्यातूनच गोव्यातील समाजमनाचे वेगळेपण
जाणवले. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे किंवा कर्णाटकातील बंगळूर या मेगा व मेट्रो शहरांच्या तुलनेत
गोव्यातील प्रत्येक शहर हे लहानच म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांच्या सारखे "फास्ट" जीवन नसून
इथल्या जीवनाला एका शांत प्रवाहासारखा संथपणा आहे.
गोंय समाजाची सांगता येण्यासारखी वैशिष्ठ्ये आहेत, व ती गोंयकरांना इतर प्रातीयांच्या
तुलनेत श्रेष्ठ ठरवतात असे म्हणायला हरकत नाही. यालाच मी अँडव्हाण्टेज गोवा म्हणते. त्यातील
सर्वात मोठा अँडव्हाण्टेज म्हणजे साक्षरता आणि शिक्षण. गोव्यातील साक्षरता ९५ टक्क्याच्या
आसपास आहे आणि शाळकरी वयातील कोणतीही मुलगी किंवा मुलगा घरी बसत नाही. त्यामुळे
शिक्षणाची किमाण पातळी ही आठवी पर्यंतची आहे. महाराष्ट्रात १०० ते ११० टक्के पहिलीचे एनरोलमेंट
असूनही गळतीला  दुसरी तिसरीपासूनच झपाट्याने सुरूवात होते. गोव्यातील शालेय गळती ही त्या
तुलनेने अगदी नगण्य आहे.
मात्र आठवी नंतर हे चित्र एकदम पालटते-- एखादे पान उलटावे तसे. आठवी नंतर शाळा
सोडण्याचा कल असतो. विषेशतः मुलांचा. त्यामुळे काँलेज शिक्षणात मुली पुढे व मुले मागे असे चित्र
दिसते. शाळा सोडण्याचा कल मुलींमध्येही आहे. पण तुलनेने कमी.
गोंयकरांचा दुसरा अँडव्हाण्टेज म्हणजे इथली आर्थिक विषमता किंवा दरी तुलनेने बरीच कमी आहे.
निदान आर्थिक भपका दाखवण्याच्या बाबतीत तर फारच कमी. त्यामुळे मूळ गोंयकर हा खूप श्रीमंत असूनही प्रदर्शन मांडत नाही आणि आपण इतरांपेक्षा किती श्रीमंत या चर्चेत तो असत नाही. खूपदा त्याच्यात आणि
आजूबाजूच्या चार जणांत फारसा फरकही जाणवत नाही. तीच गोष्ट सामाजिक दरीची. इथे सामाजीक
स्टेटसचा फारसा बाऊ केला जात नाही. म्हणूनच इथले मुख्यमंत्री बिनदिक्कत स्कुटरवर किंवा छोट्या
कारमध्ये फिरू शकतात. मी घराशेजारील जॉगर्स पार्क मध्ये फिरायला जात असे. तिथे प्रत्येकजण आपापल्या
व्यायामात मशगुल. पलीकडेचं मुख्यमंत्री निवासही आहे. मला खूपदा मनात विचार येई की, मुख्यमंत्री
जरी इथे फिरायला आले तरी ते आपले गार्ड वगैरे घेऊन येणार नाहीत आणि येथे जाँगिंग करणारे
देखील हात उंचावून अभिनंदन सांगण्यापलीकडे आपली लय मोडून त्यांच्याकडे धावत जाणार नाहीत. त्याची
गरजही नाही.  एरवी काही कामासाठी त्यांच्याकडे जावेच लागले तर पटकन अपॉन्टमेंट मिळते. थोडक्यांत आपल्या श्रीमंती अथवा स्टेटसचा बडेजाव दाखवणे ही गोव्याची संस्कृति नाही.  हेही सामाजिक दरी किंवा विषमता कमी असण्याचे गमक आहे.
गोंयकरांचा तीसरा अँडव्हांण्टेज म्हणजे रम्य निसर्ग. गोव्यातील दर हेक्टरांमागचे वनक्षेत्र
मोजले तर गोव्याचा नंबर खूप वरचा आहे.  ठरवून दिलेले राष्ट्रीय मानक सांगते की २३ टक्के जमीन तरी
वनांखाली असावी. गोव्यात त्यापेक्षा जास्त जमिन वनक्षेत्राखाली आहे. त्यामुळे इथल्या हवेत प्रदूषण कमी
आणि निसर्गाचा लहरीपणा  देखील कमी.
चौथा अँडव्हाण्टेज म्हणजे कलासक्ती, कलाभक्ती आणि कला-नैपुण्य! इथला कलाकार आपल्याला
मुंबई-पुणे कडे ओळख मिळावी, दिल्ली किंवा परदेशातही ओळख मिळावी यासाठी प्रयत्न जरूर करतो पण
त्यासाठी अडून राहत नाही. कारण गोव्यामध्ये त्याच्या कलेचा सम्मान भरभरून होत असतो--मग तो लेखक
असेल, संगीत क्षेत्रात असेल, नाट्य क्षेत्रात असेल, चित्रकरिता, इतिहासज्ञ-- काहीही असो त्याला दाद देणारे
जाणते प्रेक्षक किंवा श्रोते गोव्यात मिळतातच. इथल्या कलाकारांना घरकी मुरगी दाल बराबर असे समजले
जात नाही.
गोव्याची पुरातनता, शंकराच्या मंगेशी अवतारापासून किंवा त्याही आधीपासूनची आहे. त्याची
जाणीव आपल्याला इथल्या लोक-कथांमधून मिळते. एकूण गोंयकर हा उत्सवप्रिय त्यामुळे सर्व सण पारंपारिक
पद्धतीने आणि उत्साहाने साजरे होताना दिसतात.
गोव्याला समुद्र किना-याचे ही वरदान आहे. त्यामुळे मासळी हे मोठे पिक फारस जास्त कष्ट न घेता
मिळते. पोर्तुगीज काळात त्यानी फार मोठ्या प्रमाणावर काजू लागवड केली त्यामुळे गोवा हे भारतातील काजूचे
आगार आहे असे म्हणावे लागेल. हजारो हेक्टर वन-जमीनही काजू लागवडीखाली आहे, आणि ते फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे उत्पन्नाचे मोठे साधन आहे.
               गोव्यामधील क्राईम रेट  कमी आहे. पाँप्युलेशन डेन्सिटी कमी असून निर्धोकपणा जास्त.
इथे स्त्री-पुरूष, मुलगी-मुलगा हे भेदही कमी आहेत. स्त्रिया कोणत्याही गोष्टीत सहभागी होऊ शकतात.
तसचं त्यांच स्वतंत्र व्यक्तीमत्व  जपतात. लग्न झालेल्या स्त्रीला  पुरुषाच्या सर्व मिळकतीत निम्मा वाटा आपोआप  कायद्यानेच दिलेला आहे. त्यामुळे  स्त्रियांची आर्थिक कुचंबणा होण्याचे प्रमाण कमीच. गोव्यामधे स्त्रियांविरोधी किंवा स्त्री-निगडित क्राइम-रेटही कमीच आहे.
पण हे सर्व फायदे टिकणार का आणि किती दिवस हा प्रश्न मला नेहमी पडतो. तो चार कारणांनी. त्यापैकी पहिले कारण पर्यटनाची चुकलेली दिशा. दुसरे खनिजांची चोरी. तिसरे  क्राइम रेट मधील  क्वालिटेटिव्ह फरक. आणि चौथे शासनव्यहारात कोकणी किंवा मराठी नसणे. या चौघांचा एकमेकाशी अन्योन्य संबंध आहे.
             सर्वात आधी पर्यटनाचा प्रश्न पाहू. गोवा ाही अनादिकालापासून चालत आलेली तीर्थभूमि आहे. इथे शंकर हा मंगेशी रुपाने तर पार्वती ही शांतादुर्गा रुपाने वास करते. ब्रह्मदेवाची मंदिरे फारशी नसतात. पण गोव्यात एक अति पुरातन ब्रह्म-मंदिरही आहे. इथे पांडवलेणी व पांडव येऊन गेल्याची कथानके आहेत. गोव्यातील चर्च पोर्तुगीज वारसा सांगणारे व म्हणून वेगळे आहेत. असा एक समृद्ध ऐतिहासिक-पौराणिक वारसा इथे आहे . गोव्याची खाद्य संस्कृतिही अशीच अत्यंत समृद्ध. काजू-फणस-केळी सोबत मासे व अन्य  समुद्री  खाद्यान्नांची रेलचेल तर आहेच आहे.  इथली कलात्मकताही खूप व गांवोगावचे वेगळे वैशिष्ट्य सांगणारी. निसर्गरम्यता, वनस्पति प्रजाति व सागरसान्निध्यही आहेच. तर या चार गुणांचा शोध घेत भारतात येणारे खूप पर्यटक असतात. पण गोव्यातील पर्यटन व्यवस्धा अशा पर्यटकांचा शोध वा वेध घेत नाही.              त्याऐवजी क्रूझ बोटींवर गोव्यातील नृत्य-गान संस्कृतिची झलक अशी जाहिरात करणारे पण प्रत्यक्षांत तीव्र आवाजातील संगीत, दारु,  कॅसिनो, असे मनोरंजन पुरवणारे उपक्रम यांचीच चलती आहे. अगदी कार्निवल बाबतही माझा हाच अनुभव. धर्मांतरण होऊन व हिंदु संस्कृतीतील रीतीरिवाज जोपासायचे नाहीत असा निर्बंध पोर्तुगीजांनी  आणल्यावरही शिमगा उत्सव आम्ही सोडणार नाही असा हट्ट या धर्मांतरितांनी केला कारण शिमगा हा गोव्यातील सर्वांत मोठा उत्सव. तेंव्हा त्यावर तोड म्हणून कार्निवाल हा नवा उत्सव आणला गेला व त्याचे नियंत्रण संपूर्णपणे सरकारचे असते.  असे असूनही आजच्या कार्निवल उत्सवात पर्यावरण, मिलीजुली संस्कृति किंवा शिमग्याची झलक असे कार्यक्रम पहायला मिळत नाहीत तर क्रूझवरील कार्यक्रमाच थोड्याफार फरकाने पण मोठ्या डामडौलाने असतात.  असे वाटते की गोव्यातील पर्यटनाला कॅसिनो-सेक्स-ड्रग्ज  यापलीकडे नेणे सरकारला जमूच शकत नाही. याचा खूप मोठा दुष्परिणाम तरुण पीढीवर होत आहे. गोव्यातील युवक हे खूपसे कष्टाळू नसतात. थोडीशी आरामाकडे झुकणारी त्यांची प्रवृत्ति आहे. मात्र कॅसिनो संस्कृति ही त्यांच्या दृष्टीने कमी कष्टाचे पण झटपट मोठ्या कमाईचे साधन बनले आहे. त्यांत फार कमी मुलांनाच नोकरी मिळू शकते तरीही बाकी मुले त्याच नोकरीच्या आशेवर बसून असतात. कित्येक मुले तर कॅसिनोकडे नोकरी म्हणून नाही तर जुगार खेळून पैसे मिळवण्याचे साधन म्हणून बघतात. सेक्स रॅकेट व ड्रग्ज च्या माध्यमातूनही गुन्हेगारी प्रवृत्तिकडे युवा पीढी वळत आहे.
                चारेक वर्षांपूर्वी घडलेली घटना -- आऱजे चे काम करू इच्छिणाऱ्या एका मुलाला अन्य कॉलेजातील चार मुलांनी अँकरिंगच्या कामासाठी निमंत्रण दिले व प्राथमिक चर्चेस बोलावण्याचे निमित्त करून त्याचे अपहरण केले. वडिलांकडून मोठी खंडणीही मागितली पण लौकरच प्रकरण हाताबाहेर जाईल असे वाटल्याने त्या मुलाचा खून केला. पुढे ती मुले पकडली गेली, खटला चालला व गुन्हा सिद्ध होऊन त्यापैकी दोघांना फाशी व इतरांना मोठी कैद अशी शिक्षा सुनावली गेली. ही चारही मुले अत्यंत सधन कुटुंबातील व महिना वीसेक हजार रुपये पॉकेटमनी असलेली मुले. मग तुम्हाला पैशाची गरज का वाटली व तुम्ही अपहरण का केले याचे उत्तर कॅसिनोत खेळायला पैसे कमी पडतात असे होते. शिक्षा सुनावल्यानंतरही अपराधाची जाणीव किंवा पश्चात्ताप मुलांच्या चेहऱ्यावर नसून हसूच होते असा फोटो काही वर्तमानपत्रांनी छापला. ही घटना अत्यंत गंभीर व भविष्यातील संकटाची चाहूल दाखवणारी असे मला वाटते. गोव्यातील युवा पीढी परंपरागत कलात्मकतेचे जतन करू शकणार की कॅसिनो-संस्कृतीतून फोफावणाऱ्या गुन्हेगारीकडे वळणार हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. परंपरागत गुन्हेगारीहून वेगळ्या व गंभीर गुन्ह्यांकडे तरुण पीढी वळत आहे
             कॅसिनो संस्कृतिने गोव्यात सांस्कृतिक  क्षरण होत आहे तर दुसरीकडे खनिजांच्या अनिर्बंध  व बेकायदा उपस्यामुळे निसर्गाचे क्षरण होत आहे. गोव्यत लौह खनिज मोठ्या प्रमाणावर आहे.  खूप पूर्वी पोर्तुगीज राजवटीत पोर्तुगालला संपत्तिची गरज भासली तेंव्हा त्यांनी थोड्या थोड्या प्रमाणात  लौह-खनिजाच्या उत्खननाची परवानगी देण्यास सुरुवात केली. त्यातील अटींचा भंग केल्यास कडक शासनाची भीती असल्याने त्यांचे काटेकोर पालन होई. गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त होऊन भारतात सामावला गेला, तेंव्हाही अटींचे पालन व्यवस्थित होत असे कारण मुळांत गोंयकरांचा पिण्ड कायद्याला धरून वागण्याकडेच होता. मात्र काही वर्षातच या खनिजाचे बेकायदा उत्खनन होणे, त्यामधे राजकारण्यांचा वाटा असणे, त्यासाठी नोकरशाहीसकट सर्वांचा भ्रष्टाचार, इत्यादी गोष्टींना सुरुवात झाली आणि पर्यावरण ऱ्हासाचे ते मोठो कारण बनले. बेकायदा  लौह उत्खननाचा आणखी एक मोठा तोटा देशाने सोसला. हे सर्व खनिज बेकायदा वाहतुकीच्या मार्गाने चीनकडे रवाना झाले. त्यात गोव्याप्रमाणेच आंध्र व कर्नाटकातील लोह-खनिजही गेले. ते सर्व कच्चा माल या स्वरूपात चीन मधे वापरले जाऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्का माल बनवून कमी किंमतीला भारतात पाठवत आहेत. अशा तऱ्हेने आपण दुहेरी आर्थिक नुकसान सोसत आहोत. शेवटी बेकायदा निर्यात व पर्यावरणाचा ऱ्हास या दोन्ही मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला, आणि तरीही परिस्थिती सुनियंत्रित व पर्यावरणाचा समतोल राखणारी आहे असे म्हणता येणार नाही. लौह खनिजाच्या बेकायदा उत्खननापाठोपाठ गौण खनिजे म्हणजे माती-मुरुम-वाळू यांचेही बेकायदा किंवा अनिर्बंध उत्खनन होत आहे. त्यामुळे इतर ऱ्हासांबरोबर निसर्गरम्यतेचेही नुकसान होत आहे.
            मला जाणवलेला एक मोठा अंतर्विरोध म्हणजे गोव्यातील शासन व्यवहारात मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांचा समावेश जवळजवळ शून्याप्रत असणे. खरे तर पोर्तुगीजांविरुद्ध जे मुक्ति आंदोलन लढले गेले त्यामधे या दोन्हीं भाषिकांनी या भाषांची कास धरूनच लढा यशस्वी केला होता. त्यानंतरही कोकणीला राज्यभाषा व मराठीला पूरक भाषेचा दर्जा आहे. गोव्यामधे शिक्षणाची सोय व जागरूकता उत्तम. त्यामुळे शाळांमधे शंभर टक्के नावनोंदणी असते व आठवी पर्यंत गळती जवळजवळ शून्य असते. या सर्वांना शाळकरी मुलांना कोकणी, मराठी व हिंदी या भाषा छानपैकी येतात. शासन-व्यवहारात मात्र इंग्रजीचाच आग्रह असतो. सामान्य गोयंकरांचे इंग्रजीचे ज्ञान मला तरी अगदी यथातथाच दिसले. मग त्यांना आपले म्हणणे शासन दरबारी नीट मांडता येत नाही. मग शासनाविरुद्ध तक्रारी किंवा असंतोष सुरू होतात. गोवा राज्यांत मुख्य माहिती आयुक्त या नात्यावे काम करताना, विशेषतः माहिती अधिकाराखाली प्रश्न विचारणाऱ्यांची कुचंबणा माझ्या  लक्षांत येत होती. त्यांना मी कोकणी-मराठीतून प्रश्न विचारा असे सुचवत होते. शासन व्यवहार जोरदारपणे कोकणी वा मराठीतून होऊ लागल्यास या परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होईल असे मला वाटते.
              वन-जमिनींचा ऱ्हासही गोव्यात होऊ लागल्याचे जाणवते. खरे तर इथल्या जैव-विविधतेचे भांडवल वापरून तिचेच प्रदर्शन कणारी पर्यटन नीति अस्तित्वात आणता येईल. तरुण पीढीत वृक्षप्रेम व वृक्षज्ञान निर्माण व्हावे या हेतुने काही छोट्या संस्था काम करीत आहेत. पण त्या सोोडल्यास निसर्ग-ज्ञानाबाबत सामान्य गोंयकर मागेच दिसतो. एका वेगळ्या व पर्यावरण-पोषक पर्यटन-नीतीतून गोव्याचे  चित्र पालटू शकते. तरुण पीढीला सकारात्मक वळण लावता येऊ शकते.  गोव्याची परंपरागत संस्कृति जपणारे व दाखवणारे पर्यटन इथे अधिक समृद्धी आणू शकेल व सध्याचा  अँडव्हाण्टेज गोवात्यातूनच टिकून राहील असे मला वाटते.
----------------------------------------------------------------------------------------------------------

































Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट