अज्ञान आणि विज्ञान- एक मजेशीर घटना

अज्ञान आणि विज्ञान- एक मजेशीर घटना
१९९४-९५ मधे मी नाशिक येथे महसूल आयुक्त असतांना घडलेली ही सत्यघटना आहे. १९९५ मधे नाशिक विभाग दुष्काळग्रस्त होता. सर्वच तालुक्यामध्ये पर्जन्यमान कमी झाले. पिके जळाली. मोठे नुकसान झाले.रबीचे पीक बरे आल्यामुळे वर्ष अखेरीला लोकांना दिलासा मिळाला पण दुष्काळाची भयछाया लोकांच्या मनावर राहून गेली. त्यांत एकूण पाऊस कमी झाल्याने विहीरींचे पाणी आटले होते. त्यामुळे पुढच्या वर्षी नव्या विहीरी खणण्याची गरज निर्माण झाली.
आपल्याकडे GSDA म्हणजे ground water survey authority या नावाचे एक सरकारी खाते असते. त्यांच्या मार्फत दरवर्षी ब-याच विहीरी खोदल्या जातात.त्यातील सुमारे ८० टक्के सरकारी खर्चाने असतात, त्यामुळे त्यांनी पाण्याची शक्यता पडताळली, विहीरी खणल्या आणि त्यांना पाणी लागले नाही तर त्याचे फारसे वैषम्य कुणाला वाटत नाही, कित्येकदा त्याची माहिती कुणाला मिळत नाही. खुद्द त्या खात्याकडे अभ्यासकाच्या दृष्टीने ही सर्व माहीती मांडून त्यांचे यशस्वी - अयशस्वी हे गणित मांड़ले जाते कां? हा वेगळा प्रश्न आहे. पण जरी तस होत असल तरी त्याची माहीती लोकांपर्यंत नसते. म्हणून लोकांचा ठोकताळा असा कि, त्यांनी पडताळा करून पाणी आहे असं सांगितल्या जागांपैकी पन्नास टक्के विहीरीच यशस्वी होतात. असो.
पण जेंव्हा शेतक-यांना स्वत:च्या खर्चाने विहीर खणायची असते तेंव्हा मात्र त्यांना यापेक्षा जास्त मोठी गॅरंटी हवी असते. अशावेळी ते एखादा पानाडा गाठतात.
पानाडे, बैदू, ज्योतिषि या सर्वांना आपण एकाच तराजूत टाकतो - त्यांना आपण एकच बिल्ला लावतो - अंधविश्वास. आपण म्हणजे असा सुशिक्षित समाज ज्याला वाटते की ज्ञान हे फक्त शाळेच्या सर्टिफिकेट मधेच असते. पण माझे मत थोडे वेगळे आहे. जेव्हा GSDA नव्हते तेंव्हा कोण होते? हे पानाडेच तेंव्हा शेतक-याला पाण्याची जागा सुचवत. त्यांचेही सल्ले खुपदा चुकत. फरक असा असतो की, असे पानाडे प्रयोगाशील नसतात. त्यांनी कांय पाहीले आणि एखाद्या जागेत पाणी असल्याचा निष्कर्ष कां काढला, ते कोणाला सांगू इच्छित नाहीत कारण ते ज्ञान गुप्त राहण्यानेच त्यांचा धंदा चालणार असतो. त्याचबरोबर त्यांचा अंदाज कुठे कुठे चुकला त्यावर चर्चा करायला ते तयार नसतात कारण त्याहीमुळे त्यांचे गि-हाईक दूर जाईल व धंदा मारला जाईल अशी त्यांना भिती असते. ही भिती घालवून त्यांच्या कामातील चांगले निष्कर्ष शिकून घेणे हे समाजाला जमत नाही कारण सगळेच पानाडे कांही खरेपणाची कांस धरत नाही. गि-हाईक टिकवण्यासाठी ते खूपसे फोल दावे करीत असतात. हा तिढा जरी असला तरी शेतक-यांच्या दृष्टीने विचार केला तर GSDA कडून पाणी शोधून घेण्यासाठी येणारा खर्च आणि लागणारा वेळ (व तरीही यशाची पूर्ण गॅरंटी नाहीच) बघता त्याला पानाडा जास्त परवडतो. शिवाय यातला खरा खर्च हा GSDA किंवा पानाड्याच्या फि चा नसून खरा खर्च हा प्रत्यक्ष विहीर खणण्याचा असतो.
असो, तर या सर्व कारणांनी 1996 मधे शेतक-यांकडून पानाड्यांना मोठी मागणी होती. धुळे जिल्ह्यातील एक पानाडा जास्त यशस्वी होता- त्याला अहमदनगर जिल्ह्यांत बरीच मागणी येऊन तो या भागात फिरत होता. इतर विहीरींनाही बघत असावा. त्याने पाहीले की विहीरींचे पाणी आटले आहे. खरे तर कुणीही हेच पाहील कारण उन्हाळ्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत सर्वच विहीरींचे पाणी आटते. पण याने सांगायला सुरुवात केली- ज्या "पॅटर्न" ने या संगमनेर तालुक्यातील पाणी आटले आहे, त्याच "पॅटर्न" ने पाच वर्षांपुर्वी लातूर जिल्ह्यातील विहीरींचे पाणी आटले होते व म्हणून मला अशी धोक्याची सूचना दिसते की मे महिन्यात इथेही भूकंप येणार आहे.
आता पाणी आटण्याचा "पॅटर्न" म्हणजे कांय? त्याला नेमके कांय म्हणायचे होते? पण असा सुसंवाद घडू शकत नाही कारण प्रत्येक सुशिक्षित माणूस त्याला अंधश्रद्ध, बोगस, असेच विशेषण लावणार. बरे त्यानेही हे प्रसिद्धीसाठी केले नसेल कशावरून - त्याने खरच काही "पॅटर्न" ओळखला होता की थापा मारत होता? त्याच्याशी सुसंवाद होत नाही तो पर्यंत हे कसे कळणार होते?
तर दोन-तीन गावांमधून हळूच बातमी आली कि पानाड्याच्या निदानावरून मे महिन्यात- सुमारे तेविस तारखेस -भूकंप येणार. या बातमीने हळू हळू वेग घ्यायला सुरुवात केली. जे शेतकरी नव्हते, गांवकरी नव्हते- शहरात होते- सुशिक्षित होते- सरकारी होते- त्यांनी म्हटले- अफवा आहेत झाल- मूर्खासारख त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. पण एवढ्या "तुच्छतेच्या" शे-यांनी गांवक-यांचे समाधान होत नव्हते. बातम्यांनी जोर धरला. बरेच लोक तीन-चार महिन्यांसाठी गांव सोडून जाण्याचे ठरवू लागले, तर काही विमा कंपन्यांनी- 'भूकंप येऊन नुकसान झाल्यास" या पद्धतीने विमा उतरवायला सुरुवात केली.
मग एक दिवस त्या भागातील DIG श्री भुजंगराव मोहिते चर्चेला आले. त्यांचे म्हणणे होते- आपण शासनाकडून जादा पोलिस फोर्स मागवून ठेऊ - खरोखर भूकंप आला तर आपल्याला रिलीफ कामाला माणसे लागतील. त्यांचे दुसरे मत होते की त्या पानाड्याविरुद्ध अफवा पसरवल्याचा गुन्हा दाखल करून त्याला कैदेत टाकायचे. पण चर्चेअंती हे दोन्ही उपाय निरर्थक असल्याचे ठरले. पानाड्याला अटक केली आणि खरेच भूकंप आला तर? शिवाय जर त्याला खरेच कांही "दिसले" असेल तर लोकांना धोक्याची सूचना देणे हे चूक नाही. सच्चेपणाने जाणवलेल्या धोक्याची सूचना देणे आणि अफवा पसरवणे यांत किती थोडा फरक असतो. पण त्याला बोलावून त्याला खरोखर कांय "दिसले" ते विचारायला हवे होते. त्याचा शोध घेतला तेंव्हा आता पोलिस कैद करतील या भितीने तो गांव सोडून गेला होता व त्याचा ठावठिकाणा कोणाला माहित नव्हता. त्यामुळे ते समजुन घेण्याचा मार्गही सुटला.
एव्हाना अफवा जोरात होत्या आणि वर्तमानपत्रांतील बातम्या वाढत होत्या.
या सर्व अज्ञानावर कांही वैज्ञानिक उपाय असू शकतो का? केंद्र शासनाअंतर्गत भूवैज्ञानिकी या विभागाकडे पृथ्वीच्या पोटातील हालचाली, भूकंपाची शक्यता, इत्यादी "सेस्मोलॉजिकल" माहितीचा वेध घेणारी शाखा आहे. त्यांच्या डायरेक्टरना फोन करुन मी समस्या सांगितली- की या अफवेमुळे व विशेषत: मागे येऊन गेलेल्या लातूर भूकंपामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे व त्याचे निराकरण व्हावे. त्यांनी कबूल केले कि त्यांचे एक छोटेसे सेंटर देवळाली येथे आहे व तिथले निष्कर्ष आम्हांला सांगण्यात येतील. असे दोन-तीन "रिपोर्टस" पाहन आमच्या ध्यानात आले की गोळा केली जाणारी माहिती देवळालीच्या अगदी जवळपास मर्यादित होती, संगमनेर पर्यंत त्या मशिनची रेंज नव्हती. शिवाय त्या मशिनने गोळा केलेले सिग्नल दिल्लीला पाठवले जात व तिथून दोन केंद्राच्या माहिती बरोबर लिंकिंग करुन निष्कर्ष काढला जात असे आणि या सर्व प्रक्रियेला तीन-चार दिवस वेळ लागत असे. मी पुन्हा डायरेक्टरना फोन केला की आम्हाला याचा उपयोग नाही. आधी त्यांनी नकारात्मकच उत्तरे बोलून दाखवली- पहिला मुद्दा- ही सर्व माहिती गुप्त असते (कां?) कारण याचा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंध आहे- मी कबूल केले. आम्ही कुणालाही माहिती सांगत नाही- मी म्हटले नाकबूल, इथे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या पॅनिक होण्याचा प्रश्न आहे. शेवटी ते कबूल झाले की त्यांचे एक मोठे यंत्र संगमनेर- गांवात बसवले जाईल व डेटा गोळा केला जाईल- पण यंत्राच्या सुरक्षेची काय व्यवस्था? त्यावर मी त्यांना एका शाळेची इमारत मिळवून देण्याचे कबूल केले व खुद्द आमदार बाळासाहेब थोरात (आता मंत्री) यांच्याच शाळेची जागा दाखवली. या नव्या यंत्रामधे तीन वेगवेगळ्या व दूरदूरच्या जागांचे भूगर्भातील धक्के नोंदवून त्यांचा तिथल्या तिथले निष्कर्ष काढून ग्राफवर प्लॉट करायची सोय होती. ते मशीन आले, बसवले, चालू केले व मी पहायला गेल्यावर त्यांनी मला व चार-सहा मोजक्या व्यक्तींना आत येण्याची "परवानगी" देऊन मशीनचा कारभार, त्यामधे निघणारे ग्राफ व त्यावरुन काढायचा निष्कर्ष (पृथ्वीच्या पोटातील लहान मोठ्या झटक्यासंबंधी) हे सर्व दाखवले व आतापर्यंतचे सर्व निष्कर्ष "नॉर्मल" आहेत असेही आश्वासन दिले.
मग पुन्हा एकदा डायरेक्टरांशी संवाद झाला. तुम्ही ती खोली "टॉप सिक्युरिटी सिक्रेट झोन" ठेऊ नका हा माझा आग्रह होता. येऊन जाऊन एक महिन्याचा प्रश्न होता. मे अखेर किंवा जून मध्यापर्यंत भूकंप आला नाही तर सगळी भिती आणि अफवा बाजुला ठेऊन सगळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार होते. त्यामुळे तेवढा एक महिना त्या एका सेंटरचा डाटा जाहीर झाल्याने देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता. एखादा विचित्र "पॅटर्न" दिसला तर तो "सिक्रेट" करण्याची मुभा तिथल्या वैज्ञानिकांना द्या, पण एरवीचा डाटा सर्वांना मोकळेपणाने पाहू द्या- विशेषत: शाळेच्या मुलांना तर हे मशीन कांय आहे- कसे असते वगैरे सर्व पाहू द्या. असा मी आग्रह धरला. नाहीतरी त्या वैज्ञानिकांना तासन- तास मशीन मधून सरकत निघणा-या व ECG प्रमाने दिसणा-या त्या ग्राफकडे बघत रहाण्यापलीकडे दुसरे कांय काम होते? त्यापेक्षा शाळेतील उत्साही मुलांना भूगर्भशास्त्रांची तोंडओळख करुन देण्याची ही किती तरी चांगली संधी हाती आली होती. शेवटी या सर्वांना ते डायरेक्टर कबूल झाले आणि तेंव्हापासून पुढे महिनाभर त्या मशिनला किती शाळकरी मुलांनी भेट दिली त्याची गणतीच नको. मला नंतर किस्सा ऐकण्यांत मिळाला की या घटनेच्या शेवटी जेंव्हा मशिन काढून नेत होते तेव्हा कांही मुले चक्क रडली होती. असो.
मशीन बसले, त्याचे काम, त्यामधून निघणारे ग्राफ हे ही सर्वसामान्य माणसाने स्वतः बघण्याची व्यवस्था झाली. ते सर्व ग्राफ नॉर्मल आहेत हे कळल्यामुळे भीतीचे वातावरण हळू हळू कमी होत होते. त्या एका महिन्यांत या मशीनबद्दल व भूगर्भशास्त्राबद्दलही वर्तमानपत्रांतून लेख लिहीले गेले. पण दुसरीकडे त्या पानाड्याने वर्तवलेली तारीखही जवळ येत होती, त्यामुळे मधूनच भीती पुन्हा वाढत होती.
अशात पुन्हा एक बातमी आली कि एका गांवातील एक भला मोठा वृक्ष "जमिनीत खचला". एक माणुस रोज पहाटे त्या वृक्षाखालून शौचाला जात असे- त्या दिवशी वृक्षाची एक फांदी त्याच्या डोक्याला आदळली, म्हणुन वृक्ष खचल्याचे सिद्ध होते अशी ती बातमी होती. तो वृक्ष खचतच चाललाय अशी बातमी दुस-या दिवशीही पसरली. ह्याचे निराकरण अगत्याचे होते. म्हणून मी तहसिलदारांना फोन केला- साहजिकच त्यांच्याकडे वृक्ष खचला की नाही हे समजण्याचे साधन नव्हते. मी त्यांना सुचवले की वृक्षाच्या बुमध्यावर रंग द्या. अगदी जमिनीलगत चुन्याचा पांढरा रंग फूटपट्टीने मोजून ६ इंच, त्याच्यावर पुन्हा गेरुचा रंग ६ इंच असे त्या झाडावर पट्टे-पट्टे रंगवा म्हणजे झाड खचले अगर न खचले ते सर्वांना लगेच समजेल. त्याप्रमाणे तहसिलदारांनी लगेच त्याच दिवशी झाडालगतचा झाडोरा साफ करून घेतला, जमीन पण शक्यतो सपाट केली आणि बुंध्यावर चुना व गेरुने आलटून पालटून पट्टे ओढले. दुस-या दिवशी वर्तमानपत्रांनी ती बातमी पण छापली. पुढील तीन-चार दिवसांत जेंव्हा झाड खचत नसल्याची खात्री झाली तेंव्हा मी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना सूचनी दिली की त्यांनी आकाशवाणीवरून संदेश द्यावा कि या सर्व अफवा आहेत. संगमनेरमधले सेस्मिक व्हायब्रेशन मोजणारे मशीन आणि हे न खचलेले झाड हेच दाखवते, तरीही कांही दुर्घटना झाल्यास शासन सज्ज आहे वगैरे. मेधा गाडगीळ त्यावेळी जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी हा संदेश दिला.
ते झाड खचत नाही म्हटल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला होता. तरी पण वर्तमानपत्रांनी झाड खचलेले नाही- धोका नाही ही बातमी देणे चालूच ठेवले होते. दूरदर्शनची खास टीम येऊन त्या झाडाचे शूटींग करून गेली व त्यांनी ही बातमी वापरली.या सर्व प्रकारांतून मला जाणवले की अज्ञानाचे मूळ कशात आहे. माहिती एकमेकांपर्यंत न पोचू देणे, असलेल्या माहितीची चिकित्सक बुद्धिने परीक्षा न करणे म्हणजेच अज्ञान. त्या विरूद्ध विज्ञान म्हणजे लोकांना माहिती देत राहणे, त्यांच्या शंका घालवणे. जर सेस्मोलॉजी खात्याने त्यांच्या संगमनेर मध्ये बसवलेल्या यंत्राचे ग्राफ सर्वांना खुले ठेवले नसते तर एवढे मोठे उत्तम, यंत्र जवळ असूनही त्यांनी अज्ञानच पसरू दिले असे मी म्हटले असते. त्यांचा सर्व डाटा, बहुतेक प्रसंगी "सीक्रेट " ठेवणे हे जरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असले तरी त्या बाबतचे विज्ञान लोकांपर्यंत अधूनमधून पोचले पाहिजे, तरच ते विज्ञान, नाही तर त्यांत आणि अंधश्रद्धेत कांय फरक? मला वाटते ज्ञान या शब्दाचे व्यावहारिक रुपान्तर अज्ञानात होऊ द्यायचे की विज्ञानात करायचे हो आपणच ठरवायला हवे आणि त्याप्रमाणे धोरण आखायला हवे- तसेच त्या धोरणांत प्रसंगानुसार लवचिकता देखील असली पाहिजे.
काळ पुढे जातच होता. मे महिना गेला, जून आला व गेला, भूकंप आला नाही. बाहेरगांवी गेलेले लोक परतले, शेतकरी पेरण्यांमध्ये गुंतला आणि आम्हीही इतर सरकारी कामांकडे वळलो. पुढे ते सेस्मोलॉजीचे यंत्र परत दिल्लीला नेले. ते झाड मात्र बरेच दिवस बातमीत होते. लोक बघायला जात. नाशिक पुणे हायवेवरून जाणारी कित्येक वाहने थोडी वेगळी वाट धरून ते झाड बघून येत. मग एकदा मी पण पाहून आले आणि माझ्या पुरती या प्रकरणाची सांगता झाली.
---------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट