मुखी विठ्ठलाचे नाम आणि हाती सुताचा धागा

मुखी विठ्ठलाचे नाम आणि हाती सुताचा धागा
-- मोतीचंद बेदमुथा। उस्मानाबाद

ज्ञानेश्वर माऊलींनी एक तरी ओवी अनुभवण्याचा दिलेला संदेश आणि महात्मा गांधीजींच्या स्वदेशीच्या नाऱ्यातून निघालेला सुतकताईचा कर्मयोग यांचा अनोखा मिलाफ यंदा वारकऱ्यांच्या दिंडीतून साधला जात आहे. मुखाने विठ्ठलाचे नाव घेता घेता हातातल्या टकळीवर सुताचा धागा तयार करणार आहेत. या सुतातून तयार झालेले वस्त्र यंदाच्या आषाढी एकादशीला पांडुरंगाला अर्पण करण्यात येणार आहे.

मुखाने विठ्ठलाचे नाव घेत लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. हरिनामाचा उच्चार करीत चालताना हातातल्या टकळीवर कापसापासून धागा तयार केला तर त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकेल अशी कल्पना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रधान सचिव लीना मेहेंदळे यांना सुचली. या संकल्पनेस अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रकाश बोधले यांनी साथ दिली. वारकऱ्यांना सुतकताईचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्यात आल्या. छोट्या चरख्याप्रमाणे हातातील टकळीवर धागा तयार कसा करायचा आणि त्यापासून वस्त्र कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिंडीत सहभागी होणाऱ्या ५० महिलांना देण्यात आले.

ज्याप्रमाणे हरिनाम घेता घेता सावता माळी मळा फुलवतो, संत गोरा कुंभार माती तुडवितो आणि जनाबाई गोवऱ्या थापते त्याप्रमाणेच वारकरी हरिनाम घेत घेत हातातल्या टकळीवर सुताचा धागा तयार करणार आहेत. फावल्या वेळेत आणि अत्यल्प भांडवलात हा उद्योग करण्याची संधीही यानिमित्ताने वारकऱ्यांना मिळेल, अशी माहिती प्रकाश महाराज बोधले यांनी दिली. तसेच यावेळी दिंडीत चालत जाताना वारकरी गावागावांत स्वच्छतेचा संदेशही देणार आहेत.
......
पालखीचे स्वागत
मुखी ज्ञानबा-तुकारामाचे नाव आणि मनात विठूरायाला भेटण्याची आस घेऊन वारीला निघालेला शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीतील हजारो वारकऱ्यांचा मेळा सोमवारी उस्मानाबादमध्ये दाखल झाला. पालखीतील गजानन महाराजांच्या प्रतिमेचे व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गदीर् केली होती. पालखीचे आगमन होताच शहरानजिक श्री ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ही पालखी सोमवारी उस्मानाबादमधील 'लेडिज क्लब'च्या प्रांगणात विसावली आहे.

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट