अच्युतराव आपटे --स्मरणिकेसाठी (२०००)

26.2.2000
अच्युतराव

अच्युतराव आपटे गेल्याची बातमी आली ती मनाला चटका लावतच. पुण्याहून मिस्टरांनी फोन करुन सांगितल- वाईट बातमी आहे- तेंव्हा मनात पहिली शंका हीच आली. त्यांची प्रकृति अगदी हळू हळू खालावत होती. तरीही मन व चिंतनपर बुद्धि शेवटपर्यंत खंबीर होते- म्हणूनच ऐवढ्या लवकर ते जातील अस वाटल नव्हत.
अच्युतरावांचा आणि माझा परिचय गेल्या पंचवीस वर्षांचा होता. वयाने व मानानेही ते खूप मोठे होते. तरी पण त्यांना काका वगैरेम्हटलेल आवडत नसाव. कधीही अचानक येई- “मी अच्युतराव आपटे बोलतोय्.” त्यामुळे मनात तोच संदर्भ ठसला.

खरे तर अच्युतराव हे माझ्या वडिलांचे सहपाठी. मला हे आधी माहीत नव्हते. ते त्यांनीच सांगितले. पुढे माझे वडील पुण्याला आल्यावर त्यांच्या गाठीभेटी घडत.पण मला नेहमीच त्यांनी एक स्वतंत्र व्यक्ति म्हणू वागवले.

माझा व त्यांचा परिचय मी पुण्याला सर्वप्रथम पोस्टिंगवर प्रोबेशनरी असिस्टंट कलेक्टर म्हणून आले तेंव्हाचा. शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात- मुलांना अगदी सुरुवातीपासून कौशल्य शिक्षण- स्किल एज्युकेशन द्यावे. वगैरे पुष्कळ विचार तेंव्हापासून मनात येत होते.

ते सर्व सुमारे वीस-पंचवीस पानं लिहून काढले होते- पण पुढे कांय? त्यावेळी हवेली प्रांत अधिकारी श्री खानविलकर यांनी दोन व्यक्तींबरोबर गाठ घालून दिली- एक खानापूरचे गोपाळराव मोडक व दुसरे अच्युतराव. दोघांचा शिक्षणक्षेत्रात मोठा अधिकार आणि काम करण्याची पद्धत निराळी.

अच्युतरावांबरोबर पहिल्या भेटीतच लक्षांत आल की ते कामाला वाहून घेणाऱ्यांपैकी आहेत. विद्यार्थी सहायक समितीचे काम एवढेच मर्यादित काम त्यांच्या स्वभावात बसणारे नव्हते. ते खडकवासला येथील CWPRS या केंद्र सरकारच्या संस्थेत उच्च पदावर नोकरी करीत होतेतिथून उरलेला सबंध वेळ त्याहून अधिक कामासाठी असायचा. विद्यार्थी सहायक समितीचे काम, Beyond friendship आणि मैत्रीच्या पलीकडे या त्रैमासिकांचे काम, शिक्षण क्षेत्रातील असंख्य परिचितांचे काम. कुणीही आपले काम घेऊन त्यांच्याकडे गेले की त्यांना ते आपलेच काम वाटत असे आणि त्यांत तितकेच लक्ष घालून काम पूर्ण व्हावे याचा ते प्रयत्न करीत.

शिक्षणाबाबतचे माझे विचार वाचल्यावर त्यांनी मनावर घेऊन एक बैठक घडवून आणली. या बैठकीसाठी सर्व तयारी त्यांनीच केली. माझ्या लेखाच्या सायक्लोस्टाइलने पंचवीस तीस प्रती काढून घेतल्या. त्या काळात झेरॉक्स सुरू झाले नव्हतेस्वतःच्या सहीने बैठकीची निमंत्रण पाठवली

त्या बैठकीत पुण्याचे कुलगुरू श्री दाभोळकर, श्री ए.बी शहा, निर्मलाताई पुरंदरे यांच्या सारखी शिक्षण क्षेत्रात मोठा अधिकार असलेली मंडळी होती. माझ्या सारख्या नुकतच कॉलेजजीवन संपवून नोकरीत रूजू झालेल्या छोट्या व्यक्तीसाठी त्यांनी एवढी मोठी माणस का बोलावली व ती देखील का आली? दुसऱ्या प्रश्नाच उत्तर सोप आहे- अच्युतरावांच्या शब्दाला तेंव्हा (व शेवटपर्यंत) खूप वजन होते. ते कांही नवीन विचार करू इच्छितात म्हणजे नक्कीच तो विषय महत्वाचा असेल अशी सर्वांना त्यांच्याबद्दल खात्री होती. त्या खात्रीपायीच सर्व मंडळी चर्चेला आली होती.

पण पहिल्या प्रश्नाच कांय? ते मला त्यांनीच बोलून दाखवल- सरकारी अधिकारी म्हणून नोकरीत लागलेली माणस फारसा विचार करीत नाहीत आणि सातत्याने एकाद्या विषयाचा पाठपुरावा करू शकत नाहीत. तुम्ही वयाने व अनुभवाने लहान असल्या तरी विचार करताय आणि तो कसा राबवता येईल याची काळजी बागळगताय हा महत्वाचा मुद्दा आहे- ही तुमची वृत्ति टिकून रहावी म्हणून माझा हा हातभार लावत आहे. सरकारी नोकरीत विचार करण सोडून द्यायच नाही यासाठी एकापरीने मिळालेल ते माझच शिक्षण होत.बैठकीच्या वेळी भरभक्कम नाश्ता, चहा याची व्यवस्था तर अच्युतरावांनी केली होतीच पण बैठकीचे वृत्तांत तयार करवून घेऊन ते सर्वांना पाठवण्याची व्यवस्थादेखील केली होती.

पुढे याच विचाराची पुढली पायरी म्हणून खानपूरच्या डॉ. मोडक यांच्या सह्याद्री विकास मंडळ या संस्थेने त्यांच्या कार्यक्षेत्रापैकी वरदाडे या गांवी दहा ते वीस वर्ष वयोगटाच्या शाळा सोडून घरी बसलेल्या मुलांसाठी व्यवसाय शिक्षणाची जोड असलेला एक शैक्षणिक कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले. त्यासाठी मी, खानोलकर व डॉ. मोडक यांच्या बऱ्याच बैठका झाल्या. त्याबाबत मी मधून मधून अच्युतरावांना भेटून चर्चा करीत असे

सह्याद्री विकास मंडळाच्या मार्फत शाळा सुरू करण्यांत कांही अडचणी होत्या म्हणू एक वेगळी सोसायटी काढून काम करावे असे ठरले. त्यासाठी आम्ही तिघेच कार्यकर्ते आणि आम्हीच पदाधिकारी देखील. एव्हाना मी प्रोबेशन संपवून हवेली प्रांताचा कार्यभार घेतला होता आणि खानापूर माझ्याच कार्यक्षेत्रात होते. मात्र या उपक्रमासाठी पैशाची तरतूद करण्यासाठी माझ्या नांवाचा आणि पदाचा वापर कुठेही करायचा नाही ही सर्वांवर एक मोठी मर्यादा होती. खानोलकर त्याच सुमारास सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन बॅबकॉक हॅचरीमध्ये रुजू झाले होते. सह्याद्री विकास मंडळाकडे खेळते भांडवल कांहीच नव्हते. पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न अच्युतरावांपुढे मांडल्यावर त्यांनी लगेच पाच हजार रूपये देऊन कामाला सुरुवात करा असे सांगितले. त्यामुळे बँक खात उघडल जाऊन एका रिटायर्ड शाळा मास्तरांना नेमून कामाला सुरुवात झाली. मात्र मला फिरतीमुळे आणि इतरांना इतर कारणांमुळे या शैक्षणिक कामाकडे लक्ष देता आले नाही. मनाप्रमाणे व्यवसाय शिक्षणाची गाडी पुढे सरकेना. नेमलेले शिक्षक वारंवार आधी तीन-चार वर्षांत मुलांना मॅट्रिक करुन घेण किती महत्वाच आहे आणि ते झाल्याशिवाय व्यवसाय शिक्षण सुरू करण किती चुकीच आहे ते सांगू लागले. या ना त्या कारणाने शेवटी हा उपक्रम बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला.

मग आमच्या पदरचे पैसे जमा करुन अच्युतरावांना पैसे परत करायला मी गेले. त्यांनी पैसे घेण्याचे नाकारले. तुम्ही प्रयत्न केले. त्यांत चुका झाल्या असतील. पण प्रयत्न वाईट नव्हते. प्रयोगांत यश-अपयश येणारच" असे सांगून त्यांनी पैसे न घेताच मला परत पाठवले.

या काळात मला त्यांच्याकडून व्यवस्थापनाचे धडे मिळाले अस म्हणायला हरकत नाही. त्यांच्या विषयावर फाईल्स रचून ठेवलेल्या असायच्या. त्यांचे नंबर, विषय इत्यादि त्यांना नेमके माहीत असायचे. रोजच्या रोज काम हातावेगळे करायची शिस्त होती. जनसंपर्क किंबहुना विद्वज्जन संपर्क खूप मोठा होता. आणि ‘क’ चे काम ‘ख’ कडून होऊ शकते असे वाटले की लगेच ‘क’ च्या वतीने ‘ख’ बरोबर संपर्क साधून कामाचा अंदाज देऊन दोघांची पुढची गाठभेट ठरवून दिली जात असे. हे करतांना क आणि ख दोघेही समोर नसले की फोनवर वेळ जायचा अच्युतरावांचा. पण त्याचे त्यांना कांही वाटत नसे- काम झाले पाहिजे- चांगले काम प्राथम्याने झाले पाहिजे- हेच त्यांचे ध्येयवाक्य होते.

याच काळात येरवडा येथे SOS बालग्राम स्थापण्यासाठी तर फुलगावला विसस च्या वतीने एक बहु-उद्देशीय संस्था काढण्यासाठी जागा हवी होती ती मिळवून देण्यांत हवेली प्रांत अधिकारी म्हणून माझा थोडा हातभार लागला. विद्यार्थी सहायक समितीच्या विद्यार्थ्यांबरोबर अधून मधून चर्चेची संधी मिळावी असा मी त्यांना आग्रह केला, ती संधी पण मिळवून देत. त्या मुलांसाठी जी कमवा व शिका योजना चालते त्याबद्दल त्यांची माझी बरीच चर्चा होत असे.

विद्यार्थी सहायक समिती मधे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येऊन रहाणाऱ्या विद्यार्थ्याला कमीत कमी खर्चात रहाणे, जेवण व शिक्षणासाठी शांत वातावरण मिळाव हा संस्थेचा उद्देश. यासाठी देणग्या गोळा करून मुलांचा व संस्थेचा खर्च भागवायचा- त्यासाठी विद्यार्थ्यांना फारशी तोशीच लागू द्यायची नाही ही मनोवृत्ति. पन्नासाच्या दशकांत सुरु झालेली ही संस्था मी सत्तराच्या दशकांत पहात होते, आणि तिथून पुढे ऐंशी, नव्वदाचा दशकातही पहात असतांना खु्द्द अच्युतरावांच्या कार्यप्रणालीत कसा फरक पडत गेला ते देखील पहायला मिळाले

पूर्वी फक्त मुलांसाठी असणारी ही संस्था क्रमाक्रमाने मुलींना सामाऊन घेऊ लागली. विद्यार्थिनींसाठी वेगळे होस्टेल बांधले तोवर सौरऊर्जा वापरात येऊ लागली होती. मग या होस्टेलसाठी सोलर सिस्टम बसवून घेतली. अशा प्रकारे प्रत्येक कामात विचारपूर्वक आणि योजना पूर्वक काम होत असल्याचे कुणाही त्रयस्थाला सहज दिसून येईशिक्षणाकडून त्यांचे विचार स्त्री-शिक्षण, स्त्रियांची प्रगति अशा विषयांकडे वळू लागलेले पण दिसत होते.

सरकारी अधिकारी नेमके कांय काम करतात, कुठल्या उद्देशाने करतात आणि ते करतांना उद्देश पूर्ण होतो कां हा माझ्याशी होणाऱ्या त्यांच्या गप्पांमधला पहिला प्रश्न असे. माझे पोस्टिंग यशदा सारख्या प्रशिक्षण संस्थेत झाले तेंव्हा, नाशिकला डिव्हिजनल कमिशनर म्हणून झाले तेंव्हाही, व शेवटी राष्ट्रीय महिला आयोगात झाले तेंव्हाही. त्यामुळे आपण कोणतेही धोरण किंवा कार्यक्रम किंवा त्याची कार्यप्रणाली ठरवतांना, यशापयाने निकष लावतांना आपण हे का करतो हा प्रश्न विचारण्याची सवय मलाही लागली. मुख्य म्हणजे यांतील कोणतीही गोष्ट अच्युतरावांनी वडिलकीच्या नात्याने समजावून दिली असे नसून त्यांच्या प्रश्नातून हे आपोआप शिकायला मिळाले. मला त्यांनी नेहमीच बरोबरीच्या नात्याने वागवले. अर्थात् त्यांच्या कुणाही सहकाऱ्याचे काम शासकीय कार्यालयात अडकले असेल तर ते हक्काने सांगत आणि माझ्या मुलांच्या प्रगतीबद्दल सर्वांत आधी विचारून घेत.

जीवनाकडे बघण्याची त्यांची वृत्ति आनंदाची होती. आयुष्यांत पैसा मिळवावा, आपल्या कौशल्याच चीज कराव, मिळालेल्या पैशातून सुखोपभोगासाठी चार गोष्टी खरेदी कराव्यात, चांगले गाणे, चांगले कार्यक्रम ऐकावेत इत्यादी गोष्टींना त्यांची मान्यता होती- पण ते फक्त नोकरीतून कमावलेल्या पैशांमधून. संस्थेसाठी भरपूर पैसे गोळा करूनही त्याचा वापर त्यांनी फक्त संस्थेसाठीच केला. त्या कामातून प्रसिद्धीची हाव धरली नाही किंवा त्यासाठी कुठेही मिरवून घेतली नाहीमग एवढा जीव ओतून आपला वेळ आणि शक्ति संस्थेच्या कामासाठी का दिली याचे उत्तर त्यांनी एकदा मला सांगितले- ब्राह्मण कसा असावा, तर सतत समाजाच्या उन्नतिचा विचार करणारा, त्यासाठी स्वतःचे शरीर झिजवणारा, तीन दिवसाच्या भरण पोषणापलीकडे कांहीही संग्रह न करणारा प्रसिद्धि पराङ्मुख वृत्ति बाळगणारा, इत्यादी. ब्राह्मण असण्याची ही व्याख्या कुठल्या ग्रंथात आहे ते मला माहीत नाही, पण ज्यांना कुणाला ब्रह्मर्षी ही पदवी हवी असेल त्यांच्यासाठी ही व्याख्या मार्गदर्शक ठरते.

अच्युतरावांच्या स्वभावात आणखी एक गोष्ट आढळली. ज्याच्यात जो गुण दिसेल त्याची दखल घेऊन, लगेच प्रशंसेची पावती देणे. ही पावती बहुतेक वेळा मी ऐकली आहे ती त्या त्या व्यक्तीच्या अपरोक्षच. त्यांचे वाचन भरपूर होते. त्यामुळे कुठे कांय चांगले चालले आहे त्याची नोंद व दखल घेतलेली असायची. त्यावर चर्चा करायला त्यांना आवडायचे व त्यांतील कांही गोष्टी संस्थेत करता येतील का याचा विचार ते सतत करीत.

त्यांची वृत्ति त्यागी होती असे मी म्हणणार नाही कारण नोकरीच्या पैशातून त्यांनी गृहस्थ धर्म व्यवस्थित सांभाळला. छान छौकी नसली तरी उच्च अथिरुची बाळगली. पण संस्थेचे काम मात्र संपूर्णपणे निरपेक्षबुद्धिने केले, तेही आपली कार्यक्षमता पूरेपूर पणाला लावून

त्यांची व माझी शेवटची भेट नोव्हेंबर २००१ मधे झाली असावीशरीर थकत चालले असूनही स्मरणशक्ति व त्याहीपेक्षा आकलन शक्ति उत्तम होतीचर्चा करणेयोजना आखणेकामे होण्यासाठी सार्थक सूचना देणे हे त्या भेटीतही चालूच होतेपांडूरंग शास्त्रींचे जीवनदर्शनहिंदीमराठी भाषांमधून तांत्रिक शिक्षणरेडियो आणि टी.व्ही चा शिक्षण प्रसारासाठी उपयोग इत्यादि त्यांचे अलीकडील विचारांचे विषय होता.

अशा व्यक्तीच समाजाला टिकवून धरतात आणि पुढे नेतात यात संशय नाही. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी. लिट् दिली पण ते अशा कितीतरी सत्कारांच्या वरच्या होते हे निःसंशय!
त्यांच्या स्मृतीला माझे शतशः प्रणाम!
-----------------------------------xxx-----------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट